मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडींमध्ये आणखी एक रंजक वळण समोर आले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने नैऋत्य दिशेला प्रवेशद्वार असलेले कार्यालय नाकारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. वास्तुशास्त्रानुसार नैऋत्य दिशेला असलेले द्वार ‘दुर्भाग्याचे’ मानले जाते. त्यामुळे अशा प्रवेशद्वार असलेल्या कार्यालयामुळे पक्षाच्या कार्यात अडथळे येऊ शकतात, अशी भावना शिंदे गटातील काही नेत्यांचा आहे.
advertisement
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कोणत्या दिशेला काय असावे? याचा उल्लेख अनेक वास्तूग्रंथात आढळतो. मुख्य दरवाजा पूर्व किंवा उत्तर दिशेलाच असावा. दुसरीकडे, तुमच्या घराचा उतार पूर्व, उत्तर किंवा पूर्व-उत्तर
(ईशान कोन) दिशेला असणे शुभ मानले जाते. नैऋत्य दिशेला दरवाजा हे दुर्भाग्याचे द्वार मानले जाते . याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला पूर्वी देण्यात आलेल्या जुन्या कार्यालयाच्या इमारतीतील जागांमध्ये बदल करण्यात आला आहे. या इमारतीत एका बाजूला काँग्रेस पक्षाला दिलेले कार्यालय आता शिंदे गटाच्या शिवसेनेला देण्यात आले आहे. परिणामी, ठाकरे गटाची शिवसेना आणि शिंदे गटाची शिवसेना ही दोन्ही कार्यालये एकमेकांच्या शेजारी येणार आहेत. त्यामुळे राजकीय हालचालींना अधिक वेग येण्याची शक्यता आहे.
नेमकं काय घडलं?
दरम्यान, नैऋत्य दिशेला प्रवेशद्वार असलेले कार्यालय काँग्रेस पक्षाला देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, हे कार्यालय पूर्वीही काँग्रेसचेच होते. काही काळासाठी ते इतर कारणांमुळे बदलण्यात आले होते. मात्र आता पुन्हा एकदा तेच कार्यालय काँग्रेसकडे परत आले आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
कार्यालयांच्या अदलाबदलीमुळे राजकीय वातावरणात नव्या चर्चांना उधाण
वास्तुशास्त्रावर आधारित निर्णय राजकारणात क्वचितच उघडपणे चर्चेत येतात. मात्र या प्रकरणामुळे पक्षीय निर्णयांवर श्रद्धा, समजुती आणि परंपरांचा किती प्रभाव असतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. शिंदे गटाने घेतलेला हा निर्णय केवळ वास्तुशास्त्रीय कारणांपुरता मर्यादित आहे की त्यामागे इतर राजकीय समीकरणे आहेत, यावरही चर्चा सुरू झाली आहे. एकूणच, कार्यालयांच्या अदलाबदलीमुळे राजकीय वातावरणात नव्या चर्चांना उधाण आले असून, आगामी काळात या बदलाचा पक्षीय हालचालींवर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा :
