जोगेश्वरी पूर्वेतील नागरिकांच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये गटाराचं पाणी मिसळवलं जात असल्याचा संशय त्यांना आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार तिथल्या नागरिकांसोबत सुरू आहे. परिसरामध्ये दिवसा आणि रात्री असे दोन्हीही वेळ पाणी येतं. पण सकाळी येणारं पाणी तुलनेने स्वच्छ असतं. मात्र, रात्रीच्या वेळी जेव्हा पाणी सोडलं जातं, त्यावेळी पाण्याच्या पाईपलाईनचा पाण्याचा फ्लो बराच कमी होतो. त्यावेळी नागरिकांना मिळणाऱ्या पाण्यामध्ये, गटाराचं पाणी मिसळवून पाणी सोडलं जातं, असा आरोप काही नागरिकांनी केला आहे. रात्रीच्या वेळी जेव्हा पाणी येतं, तेव्हा पाणी काळपट रंगाचं दिसतं आणि त्याला उग्र वास येतो, अशी माहिती स्वत: नागरिकांनी दिली आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, पाण्याची पाईपलाईन आणि सांडपण्याची वाहिनी एकत्र जात असल्यामुळे पाण्याच्या पाईपलाईनमध्ये सांडपाणी सुद्धा मिसळत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिसरातील अनेक रहिवाशांच्या अजूनही जुन्या पाईपलाईनच आहेत. जुन्या आणि गंजलेल्या पाईपलाईनमध्ये सांडपाणी जात असल्याचं बोलले जात आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रकाराला तांत्रिक भाषेमध्ये सायफोनेज असं म्हटलं जातं. या प्रक्रियेमुळे कमी दाबामध्ये बाहेरील दूषित पाणी पिण्याच्या पाईपलाईनमध्ये ओढले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळेच रात्रीच्या वेळी नळावाटे स्थानिक नागरिकांना विषारी पाणी पोहोचत असल्याचा आरोप होत आहे.
