समृद्धी महामार्गाचा भिवंडीमार्गे थेट ठाण्यात प्रवेश
सध्या समृद्धी महामार्गावरून अतिवेगाने येणाऱ्या वाहनांना आमणेहून वरळी, वांद्रे, अंधेरी किंवा दक्षिण मुंबईकडे जाण्यासाठी किमान दोन तासांचा जास्त वेळेचा प्रवास करावा लागतो. ही अडचण दूर करण्यासाठी राज्य सरकारने ठाणे जिल्ह्यात एक नवा आठ पदरी रस्ता उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 18 किलोमीटर लांबीचा हा नवा रस्ता समृद्धी महामार्गावरील आमणे परिसरातून सुरू होऊन थेट दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या सागरी मार्गाशी जोडण्यात येणार आहे. या रस्त्यामुळे नागपूरहून निघालेली वाहने ठाणे, भिवंडी किंवा मुंबई शहरातील अंतर्गत मार्गांमध्ये प्रवेश न करता थेट पुढे जाऊ शकणार आहेत.
advertisement
आमणे ते दक्षिण मुंबई अवघ्या तासाभरात
हा प्रस्तावित आठ पदरी मार्ग मुंबई-वडोदरा महामार्ग, ठाणे सागरी किनारी मार्ग आणि समृद्धी महामार्ग यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. भविष्यात या मार्गावरून सागरी सेतू आणि कोस्टल रोडच्या माध्यमातून वाहनांना थेट दक्षिण मुंबईत प्रवेश मिळणार आहे. परिणामी सध्या आमणे ते दक्षिण मुंबईसाठी लागणारा दोन तासांचा प्रवास अवघ्या एका तासात पूर्ण होण्याची शक्यता आहे.
एमएसआरडीसी माध्यमातून उभारण्यात आलेल्या समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते आमणे-भिवंडी हा प्रवास सात तासांत शक्य झाला आहे. मात्र पुढील टप्प्यातील अडथळे लक्षात घेता नागपूर ते दक्षिण मुंबई थेट, सुलभ आणि अतिजलद प्रवासासाठी हा नवा आठ पदरी रस्ता गेम-चेंजर ठरणार असल्याचे मानले जात आहे. सध्या या प्रकल्पाची प्राथमिक चाचपणी आणि नियोजन प्रक्रिया सुरू आहे.
