स्वप्न लवकरच साकारणार
मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे अर्थात बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत पालघर जिल्ह्यातील डहाणू परिसरात डोंगरातील बोगद्याचे भुयारीकरण यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. मंगळवारी या बोगद्याचा ब्रेक-थ्रू करण्यात आला. या कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि पालघरचे खासदार हेमंत सावरा यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थिती लावली.
डहाणू जवळील महत्त्वाचा टप्पा यशस्वीरीत्या पार
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पालघर जिल्ह्यात बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी एकूण सात बोगदे बांधले जात असून मंगळवारी पूर्ण झालेला एमटी-6 हा त्यातील दुसरा बोगदा आहे. या बोगद्याची लांबी 456 मीटर असून रुंदी 14.4 मीटर आहे. या बोगद्याचे खोदकाम न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीने करण्यात आले आहे. या पद्धतीत ड्रिलिंग आणि नियंत्रित स्फोटांचा वापर केला जातो त्यामुळे कठीण आणि गुंतागुंतीच्या भूगर्भीय भागात काम करणे सुलभ होते. अवघ्या 12 महिन्यांत हे काम पूर्ण करण्यात आले आहे.
advertisement
दरम्यान राहिलेल्या बोगद्यांचे कामही वेगाने सुरू असून लवकरच ते पूर्ण होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. संपूर्ण 508 किलोमीटरच्या बुलेट ट्रेन मार्गावर एकूण 27.4 किलोमीटरचे बोगदे असून त्यात 21 किलोमीटर भूमिगत आणि 6.4 किलोमीटर पृष्ठभागावरील बोगद्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रात सात डोंगरी बोगदे बांधले जात असून त्यांची एकूण लांबी सुमारे 6 किलोमीटर आहे.
पालघर रेल्वे प्रकल्पांना गती
याशिवाय बोरिवली-विरार पाचवी आणि सहावी मार्गिका, विरार-डहाणू तिसरी आणि चौथी मार्गिका, पालघर रेल्वेस्थानकाचा पुनर्विकास आणि वसई येथे नवीन मेगा टर्मिनल उभारणीची कामेही वेगाने सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
