दिल्लीतील या घटनेने देशभरात खळबळ उडाली आहे. आयएएस कोचिंग सेंटरसह इतर ठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे. हे कसं झालं? नेमकं काय घडलं? असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात आहे. कोचिंग सेंटरच्या बेसमेंटमध्ये पाणी कसं भरलं आणि विद्यार्थी बाहेर का पडू शकले नाही असा सवाल आता उपस्थित होत आहे.
तीन जणांच्या मृत्यूनंतर इतर विद्यार्थ्यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. आयएएस कोचिंग सेंटरवर कारवाईची मागणी केली आहे. परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस तैनात करण्यात आले आहेत. एका विद्यार्थ्यानं सांगितलं की, मुसळधार पाऊस पडत होता आणि रस्त्यावर पाणी भरलं होतं. क्लास संपल्यानंतर काही लोक सेंटरमध्येच अडकले.
advertisement
राव कोचिंग सेंटरची लायब्ररी तळमजल्यावर आहे. पावसामुळे पाण्याचा मोठा प्रवाह आत घुसला आणि अनेक विद्यार्थी अडकले. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, कोचिंग सेंटरच्या एंट्री आणि एक्झिटच्या रेकॉर्डसाठी गेटवर बायोमेट्रिक सिस्टिम लावली होती. त्यातच पाणी शिरल्यानं ही सिस्टिम बंद झाली आणि विद्यार्थी आतच अडकले. तर काही लोकांनी पाण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचं म्हटलंय.
दिल्ली सेंट्रल झोनचे डीसीपी हर्षवर्धन यांनाही बायोमेट्रिक सिस्टिममुळे अडकले का असं विचारलं असता ते म्हणाले की, असं म्हणतायत पण हा तपासाचा विषय आहे. शवविच्छेदनानंतरच हे स्पष्ट होईल की पाण्यात बुडाल्याने की वीजेचा धक्का लागून त्यांचा मृत्यू झाला.
