आशिष आणि अंजू यांचा विवाह अवघ्या तीन महिन्यांपूर्वी झाला होता. घटनेनंतर अंजूने दिलेल्या जबाबांमध्ये सतत बदल होत असल्याने पोलिसांना संशय आला. तपास अधिक खोलात गेल्यावर हे प्रकरण साधा अपघात नसून कट रचून केलेला खून असल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांना मेघालयातील गाजलेल्या ‘हनीमून मर्डर’ प्रकरणाची आठवण झाली. त्याच धर्तीवर राजस्थानमध्येही नवविवाहानंतर पतीचा खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, अंजूने तिच्या प्रियकराच्या मदतीने पती आशिषचा खून घडवून आणला आणि तो अपघात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला.
advertisement
ही घटना 30 जानेवारी रोजी घडली. रात्री सुमारे 9 वाजता श्रीगंगानगर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अमृता दुहान यांना रस्त्यावर एक जोडपे बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती मिळाली. दोघांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी आशिषला मृत घोषित केले.
पत्नीचा दावा काय होता?
23 वर्षीय अंजूने पोलिसांना सांगितले की, संध्याकाळी फिरायला बाहेर पडले असताना एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या धडकेत आशिषचा मृत्यू झाला आणि तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटण्यात आल्याचा दावाही तिने केला.
मात्र तपासादरम्यान पोलिसांना घटनास्थळावरील परिस्थिती आणि अंजूच्या कथनात मोठी तफावत आढळली. आशिषच्या शरीरावर गंभीर जखमा होत्या आणि गळा आवळल्याचेही चिन्ह दिसून आले. विशेष म्हणजे अंजूला कोणतीही गंभीर इजा झाली नव्हती.
पोलिसांनी अंजूचे कॉल रेकॉर्ड तपासले असता, ती संजू नावाच्या तरुणाच्या सातत्याने संपर्कात असल्याचे समोर आले. संजू हा तिच्या घराजवळच राहत होता.
लग्नानंतर काही काळातच अंजू असमाधानी असल्याचे सांगितले जाते. ती पतीला सोडून माहेरी परतली होती. तेथे तिचे जुन्या प्रियकर संजूशी पुन्हा संबंध जुळले आणि दोघांनी मिळून आशिषचा काटा काढण्याचा कट रचल्याचा आरोप आहे.
30 जानेवारीच्या रात्री अंजूने आशिषला एका एकांत रस्त्यावर नेले. तिथे संजू आणि त्याचे दोन साथीदार रॉकी उर्फ रोहित आणि बादल उर्फ सिद्धार्थ आधीच दबा धरून बसले होते. तिघांनी मिळून आशिषवर हल्ला केला, गळा आवळून त्याचा खून केला आणि नंतर हा प्रकार अपघात असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या प्रकरणात अंजूसह सर्व चार आरोपींना अटक केली आहे.
मेघालय ‘हनीमून मर्डर’ प्रकरणाची पार्श्वभूमी
मेघालयमधील ‘हनीमून मर्डर’ प्रकरणाने देशभरात खळबळ उडवली होती. मे 2025 मध्ये विवाहानंतर काही दिवसांतच राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनम हनिमूनसाठी मेघालयात गेले होते. अवघ्या 12 दिवसांत राजाचा मृतदेह जंगलात आढळला.
तपासात उघड झाले की, सोनमने तिचा प्रियकर राज कुशवाहासोबत मिळून राजाचा खून केला होता. हा प्रकार अपघात वाटावा यासाठी कट रचण्यात आला होता. काही दिवसांनी सोनम उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे एका ढाब्यावर सापडली आणि तिला ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात कुशवाहा आणि इतर तीन सुपारी किलर्सनाही अटक झाली होती.
