पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसोबतच्या सीमेवरील तणावादरम्यान दिल्लीत खूप गोंधळ आहे. भारताने याआधीच पाकिस्तानबद्दल काही कठोर निर्णय घेतले होते. त्यानंतर आज अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल त्यांच्या निवासस्थानी पोहोचले.
मोदींच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीत तिन्ही सैन्याच्या प्रमुखांनीही भाग घेतला. ही बैठक सुमारे एक तास चालली. यानंतरही राजनाथ सिंह बराच वेळ पंतप्रधानांसोबत बसून राहिले. पहलगाम हल्ल्यानंतर राजनाथ सिंह यांची पंतप्रधान मोदींशी ही चौथी भेट आहे. गेल्या 12 तासांत पंतप्रधान मोदी राजनाथ सिंह यांना भेटण्याची ही सलग दुसरी वेळ आहे.
advertisement
दहशतवादाविरोधात कठोर भूमिका
पंतप्रधान मोदी यांनी दहशतवादाविरुद्ध भारताची शून्य-सहिष्णुता (Zero Tolerance) भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित केली. त्यांनी स्पष्ट केले की, दहशतवादाला कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही आणि त्याला मुळापासून उखडून टाकण्यासाठी भारत कटिबद्ध आहे. दहशतवादाला चिरडून टाकणारा प्रहार करणे, हा आमचा राष्ट्रीय संकल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सशस्त्र दलांवर पूर्ण विश्वास
पंतप्रधान मोदी यांनी भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्यावर आणि त्यांच्या व्यावसायिक क्षमतेवर पूर्ण विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, मला भारतीय सशस्त्र दलांच्या व्यावसायिक क्षमतांवर पूर्ण विश्वास आणि खात्री आहे. यातून मोदींनी सैन्यदलांचे मनोधैर्य उंचावण्याचा प्रयत्न केला आणि सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा संदेश दिला.
कारवाईचे सर्वाधिकार सैन्यदलांना
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, दहशतवादाला प्रत्युत्तर कसे, कुठे आणि कधी द्यायचे, याचे सर्वाधिकार सशस्त्र दलांना देण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले, सैन्यदलांना आपल्या प्रतिसादाची पद्धत, लक्ष्य आणि वेळ ठरवण्याचे पूर्ण कार्यान्वयन स्वातंत्र्य आहे. याचा स्पष्ट अर्थ आहे की, संभाव्य कारवाईची रणनीती आखण्याचे आणि ती अंमलात आणण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य आता भारतीय सैन्यदलांना असेल.