नेमकी घटना काय?
संबंधित उमेदवाराने धावण्याच्या चाचणीत आपला वेग आणि शक्ती वाढवण्यासाठी अंमली स्वरूपाच्या किंवा अति-शक्तीवर्धक पेयाचे सेवन केले होते. सुरुवातीला त्याने आपली धावण्याची चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली आणि तो मैदानातून बाहेरही पडला. मात्र, काही वेळातच त्या पेयाचा मेंदूवर विपरीत परिणाम झाला. तो तरुण अचानक ओरडू लागला आणि नियंत्रणाबाहेर जाऊन धिंगाणा घालू लागला. यामुळे मैदानावर उपस्थित इतर उमेदवार आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.
advertisement
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून तिथे तैनात असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) जवानांनी तात्काळ धाव घेतली. त्यांनी मोठ्या शिताफीने त्या उमेदवाराला नियंत्रणात आणले. त्याची बिघडलेली प्रकृती पाहता त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी युद्धपातळीवर उपचार सुरू केल्याने सध्या त्या तरुणाची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलीस भरतीसारख्या अत्यंत शिस्तबद्ध प्रक्रियेत अशा प्रकारे उत्तेजित पदार्थांचा वापर होणे ही चिंतेची बाब ठरली आहे. केवळ 'शॉर्टकट' वापरून यश मिळवण्याच्या प्रयत्नात या उमेदवाराने स्वतःचा जीव धोक्यात घातलाच, शिवाय त्याचे पोलीस होण्याचे स्वप्नही आता धोक्यात आले आहे. या घटनेनंतर भरती प्रक्रियेतील सुरक्षा आणि तपासणी अधिक कडक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
