नेमकी काय होती घटना?
3 फेब्रुवारी रोजी खोपोलीजवळ आडोशी बोगद्यानजीक प्रोपोलिन गॅसचा टँकर उलटला होता. गॅस गळतीचा धोका असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईकडे जाणारी लेन पूर्णपणे बंद करण्यात आली होती. यामुळे २० ते २२ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अन्न, पाणी आणि मूलभूत सुविधांशिवाय लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत १ लाखांहून अधिक लोक ३२ तास रस्त्यावर अडकून पडले होते.
advertisement
निर्देशानंतरही टोल कापला गेल्याने निर्णय
वाहतूक कोंडीची भीषणता पाहून राज्य सरकारने तात्काळ टोल वसुली थांबवण्याचे आदेश दिले होते. मात्र, फास्टॅग (FASTag) ही स्वयंचलित प्रणाली असल्याने तांत्रिक कारणांमुळे अनेक वाहनचालकांच्या खात्यातून टोलचे पैसे कापले गेले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक स्तरांतून हा टोल परत करण्याची मागणी करण्यात आली होती. याची दखल घेत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) आता परताव्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
परतावा कसा मिळणार?
थेट जमा: टोलची रक्कम संबंधित वाहनचालकांच्या फास्टॅग खात्यात थेट डिजिटल पद्धतीने जमा केली जाईल. ३ फेब्रुवारीला एक्सप्रेसवे आणि पुणे-बेंगळुरू महामार्गावरील टोल नाक्यांवर ज्यांचे पैसे कापले गेले, त्यांनाच हा परतावा मिळेल. महामंडळाने आयआरबी (IRB) इन्फ्रास्ट्रक्चरकडून अशा सर्व वाहनांचा डेटा मागवला असून ओळख पटवण्याचे काम पूर्ण झाले आहे. येत्या आठवड्याभरात ही रक्कम प्रवाशांना परत मिळण्यास सुरुवात होईल.
प्रशासनाकडून स्पष्टीकरण
"टोल नाक्यांवरील बॅरिकेट्स पूर्णपणे उघडेपर्यंत काही तांत्रिक व्यवहार आपोआप झाले असावेत. मात्र, प्रवाशांना नाहक भुर्दंड सोसावा लागू नये, याला आमचे प्राधान्य आहे. भविष्यात अशा आपत्कालीन स्थितीत समन्वय राखण्यासाठी तांत्रिक सुधारणा केल्या जातील," असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले
