मिळालेली माहिती अशी की, सकाळी ९ ते ११ या वेळेत भारतरत्न आंबेडकर चौक, महात्मा फुले चौक आणि मार्केट यार्ड यांसारख्या वर्दळीच्या ठिकाणी या कुत्र्याने धुमाकूळ घातला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, कुत्रा अत्यंत हिंसक झाला होता आणि समोर येणाऱ्या प्रत्येकाचा तो लचका तोडत होता. या दहशतीमुळे अनेक दुकानदारांनी आपली दुकाने बंद केली, तर नागरिक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावू लागले.
advertisement
लहान मुलांसह ३३ जण जखमी
या हल्ल्यात ४ मुले, ७ महिला, २२ पुरुष आणि काही ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. सर्व जखमींना तातडीने चाकण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांना रेबीज प्रतिबंधक लस आणि प्रथमोपचार देण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे. मात्र गंभीर जखमा असलेल्या काही रुग्णांना पुढील उपचारासाठी पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, या हल्ल्यानंतर काही तासांतच संबंधित कुत्र्याचा मृत्यू झाला. कुत्र्याला खरोखरच रेबीज होता का, हे तपासण्यासाठी पशुवैद्यकीय विभागाने नमुने गोळा केले असून ते प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
या घटनेमुळे चाकणमधील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी नगरपरिषदेकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. चाकण नगरपरिषदेने आता इतर भटक्या कुत्र्यांवर देखरेख ठेवण्यासाठी मोहीम सुरू केली असून, आक्रमक लक्षणे दिसणाऱ्या प्राण्यांची माहिती देण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
