पप्पा मला फी भरायचीये...
मॅडमने पालकांना सांगायला हवं होतं. शिक्षकांनी पालकांना सांगितलं असतं तर ही घटना टळली असती. माझा मुलगा घरातून बाहेर पडण्याच्या आधीच म्हणाला होता, पप्पा फी भरायचीये. त्यावर मी म्हटलं पुढच्या महिन्यात भरू. आम्हाला 70 ते 80 हजार रुपये फी सांगितली होती. माझी मोठी मुलगी तिथंच होती, म्हणून मी मुलाला देखील तिथंच टाकलं. ऐवढे पैसे भरून सुद्धा मुलं सुरक्षित नाहीत, असं म्हणत मयत मुलाच्या वडिलांनी संताप व्यक्त केला.
advertisement
तीन दिवसापूर्वी जबर मारहाण
तीन दिवसापूर्वी त्याला मारहाण झाली होती. त्याने कुणालाच सांगितलं नव्हतं. त्याने त्याच्या मम्मीला पण सांगितलं नव्हतं. आमच्या घरात लग्न होतं, तिथंही तो आला नव्हता. त्याला पँन्ट फाटेपर्यंत मारलं होतं. एकुलता एक मुलगा होता माझा. सकाळी आम्ही दोघं एकत्र निघालो होतो, असं मयत विद्यार्थ्याचे वडील म्हणाले.
गणिताचा तास सुरू होता अन्...
भर क्लासमध्ये जर मुलाचा गळा कापत असतील तर शिक्षक झोपले होते का? असा संतप्त सवाल मयत तरुणाच्या पालकांनी विचारला आहे. ही घटना घडली त्यावेळी गणिताचा तास सुरू होता. त्यावेळी हल्ला केलेला तरुण 15 मिनिट लेट आला होता. त्यावेळी शिक्षकाने रोखलं का नाही? असा सवाल देखील विचारला गेला आहे.
पोलिसांना कळवलं असतं, तर...
या प्रकरणावर डीवायएसपींनी प्रतिक्रिया दिली. 'पुण्याच्या राजगुरूनगरमध्ये दहावीतील मुलाची हत्या झाली, मित्रानेच गळा चिरुन तो पसार झालाय. पण या दोघांमध्ये तीन महिन्यांपूर्वी भांडण झालं होतं, त्याचवेळी पोलिसांना याबाबत कळवलं असतं. तर कदाचित ही घटना घडली नसती',असं डीवायएसपी अमोल मांडवे यांनी माहिती दिलीये. हल्ला करणाऱ्या मुलाने गळ्यावर आणि पोटात चाकूने वार केलेत, शिकवणीमध्ये एका बेंचवर बसलेले असताना ही धक्कादायक घटना घडली.
तुमची मुलं काय करतात?
आता हल्ला करणाऱ्या मुलाचा शोध सुरुये. पालकांनी या घटनेतून बोध घ्यायला हवा आणि स्वतःच्या मुलांसोबत योग्य ते संभाषण ठेवायला हवं. आपल्या मुलाचे मित्र कोण आहेत? ते फावल्या वेळेत काय करतात? कुठं बसतात? याची माहिती पालकांनी ठेवावी, असं आवाहन ही डीवायएसपी अमोल मांडवे यांनी केलंय.
