पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील कारेगाव गणात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून उमेदवारी मिळालेल्या निर्मला नवले यांचा भाजपच्या मनीषा पाचंगे यांनी 393 मतांनी पराभव केला. नवले यांना 6500, तर पाचंगे यांना 6693 मते मिळाली. सोशल मीडियावर प्रचंड हवा असूनही पराभव पत्करावा लागल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.
कुठे गणित बिनसलं?
advertisement
प्रचाराच्या काळात निर्मला नवले यांच्या सभांना मोठी गर्दी, फेसबुक लाईव्ह, युट्यूब व्हिडिओ, इन्स्टाग्राम रील्स यामुळे त्यांचा प्रचार डिजिटल पातळीवर झपाट्याने पोहोचत होता. त्यामुळे ऑनलाइन लोकप्रियतेचं थेट रूपांतर मतांमध्ये होईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र प्रत्यक्ष मतदानात ग्राऊंड लेव्हलवर पोहोचलेला प्रचार, स्थानिक प्रश्नांवर थेट संवाद आणि संघटनात्मक ताकद यामुळे मनीषा पाचंगे यांना निर्णायक आघाडी मिळाली.
निर्मला नवले यांच्या पराभवाची पाच कारणे
- डिजिटल प्लॅटफॉर्मवरील झगमगाट, लक्झरी जीवनशैली आणि ग्लॅमर हे ग्रामीण मतदारांच्या रोजच्या प्रश्नांशी फारसं जोडलेलं नसल्याचं दिसलं. पाणी, रस्ते, वीज, आरोग्य, रोजगार यांसारख्या मूलभूत मुद्द्यांवर अपेक्षित ठोस आश्वासनं आणि कामाचा प्रभावी प्रचार नवले यांच्याकडून कमी पडला.
- नवऱ्याने दिलेल्या Range Rover गाडीवर आनंद व्यक्त करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. "सरपंच पदावर एवढं कमावता येतं?" अशा प्रतिक्रिया येऊ लागल्या.
- भाजपच्या मनीषा पाचंगे यांनी डोअर टू डोअर प्रचार, स्थानिक कार्यकर्त्यांचे जाळे आणि महिला मतदारांशी थेट संवाद या जोरावर विश्वास संपादन केला. प्रत्यक्ष भेटीगाठी आणि स्थानिक समस्या सोडवण्यावर दिलेला भर मतदारांना अधिक भावला.
- राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली असली तरी संघटनात्मक पातळीवर अपेक्षित ताकद उभी राहिली नाही. त्याउलट भाजपने बूथ पातळीवर प्रभावी यंत्रणा उभी करत मतांचे प्रभावी ध्रुवीकरण केले.
- ‘इन्स्टास्टार सरपंच’ ही ओळख सुरुवातीला जमेची वाटली, मात्र निवडणुकीत हीच प्रतिमा दुधारी तलवार ठरली. जनतेला ‘काम करणारी नेता’ अपेक्षित असते, ‘सेलिब्रिटी नेता’ नव्हे — हा स्पष्ट संदेश मतदारांनी दिला.
हा व्हिडिओ विरोधकांसाठी आयतं कोलीत मिळालेलं हत्यार ठरला आणि ‘सामान्य जनतेपासून दूर गेलेली नेता’ अशी प्रतिमा तयार झाली.
हा पराभव अजित पवार गटासाठीही धक्कादायक मानला जातोय. सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असलेल्या उमेदवाराचा पराभव हा भविष्यातील निवडणूक रणनितीसाठी आत्मपरीक्षणाचा मुद्दा ठरणार आहे.
