...अन् बापू नायरच्या आयुष्याची दिशा बदलली
केरळमधील वायनाड जिल्ह्यातील एका छोट्या गावातून उदरनिर्वाहासाठी पुण्यात आलेल्या नायर कुटुंबाचा बापू प्रभाकर नायर हा मुलगा. त्याचे वडील पुण्यात स्थायिक झाले आणि बापूने बिबवेवाडी परिसरात आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीच्या काळात तो अत्यंत सामान्य आयुष्य जगत होता. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्याने काही काळ चारचाकी चालकाचे कामही केले. मात्र, 2001 मध्ये एका मित्रासाठी घेतलेल्या धावपळीत त्याच्यावर सहकारनगर पोलीस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आणि बापू नायरच्या आयुष्याची दिशा बदलली.
advertisement
भरदिवसा मिरवणुकीत बैजू नवघणेचा खून
हळूहळू बापूने बिबवेवाडी, धनकवडी आणि कोंढवा भागात आपली पकड मजबूत करण्यास सुरुवात केली. याच काळात त्याचे आणि स्थानिक गुंड बैजू नवघणे यांच्यात वर्चस्वावरून वाद सुरू झाले. 2011 मध्ये एका देवीच्या मिरवणुकीत झालेल्या वादाचा बदला म्हणून बापू नायर टोळीने भरदिवसा बैजू नवघणेचा खून केला. या खुनामुळे पुण्याच्या गुन्हेगारी जगतात बापू नायरचे नाव मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले. त्यानंतर त्याने कोथरूडचा कुख्यात गँगस्टर गजानन मारणे याच्याशी हातमिळवणी केली आणि केबल व्यवसायात आपले पाय रोवले.
शिवसेनेचे नेते दीपक मारटकरच्या खुनात अटक
अनेक वर्षे कारागृहात काढल्यानंतर 2020 मध्ये शिवसेनेचे युवा नेते दीपक मारटकर यांच्या खून प्रकरणात बापूचे नाव पुन्हा चर्चेत आले. ससून रुग्णालयात उपचारासाठी आलेला असताना त्याने या कटातील मुख्य आरोपीची भेट घेतल्याचे तपासात समोर आले होते. या गुन्ह्यात त्याला पुन्हा अटक करण्यात आली. 2024 मध्ये जामिनावर बाहेर आल्यानंतर आता बापु नायरची टोळी पूर्वीसारखी सक्रिय नसल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.
बापू नायरवर राजकीय वरदहस्त
दरम्यान, कोणताही गुंड राजकीय वरदहस्त असल्याशिवाय मोठा होत नाही किंवा तो गँगस्टर म्हणून नावारूपाला येत नाही, हे खरं तसं या गुंडाचा राजकीय वापर देखील तशाच पद्धतीने होते, हे देखील तितकंच खरं. बापू नायर यासोबतच शहरातील गँगस्टरचा त्या-त्या काळच्या राजकीय परिस्थितीनुसार वापर करून घेण्यात आल्याचे पोलिस खासगीत सांगतात. अशातच आता अजित पवार यांनी बापू नायरला तिकीट दिल्याने अनेक प्रश्न देखील उपस्थित केले जात आहे.
