गरुड पुराण काय सांगते?
गरुड पुराणानुसार, मृत व्यक्तीचा अंतिम संस्कार करण्याचा अधिकार प्रामुख्याने पुत्राला असतो. जर पुत्र नसेल, तर नातू, धाकटा भाऊ किंवा त्याच्या कुटुंबातील पुरुष सदस्याने हा विधी करावा, असे मानले जाते. प्राचीन काळी महिलांना स्मशानभूमीत जाण्याची परवानगी नव्हती, त्यामागे महत्वाची दोन कारणे होती.
मानसिक कोमलता: महिलांचे मन हळवे असते, त्यामुळे स्मशानभूमीतील दृश्य पाहून त्या मानसिकदृष्ट्या खचू शकतात असा समज होता.
advertisement
नकारात्मक ऊर्जा: स्मशानभूमीत नकारात्मक शक्तींचा प्रभाव असतो, ज्याचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर होऊ शकतो, अशी त्या काळातील धारणा होती.
महिलांना अधिकार कधी मिळतो?
शास्त्रात असेही नमूद केले आहे की, जर एखाद्या व्यक्तीला पुत्र नसेल किंवा कुटुंबात कोणताही पुरुष वारस नसेल, तर अशा वेळी मुलगी किंवा कुटुंबातील स्त्री अंत्यसंस्कार करू शकते. 'धर्मसिंधू' आणि 'निर्णयसिंधू' या ग्रंथांनुसार, काही विशेष परिस्थितींमध्ये महिलांना मुखाग्नी देण्याचा पूर्ण अधिकार आहे.
बदलती सामाजिक परिस्थिती
आजच्या आधुनिक युगात ही परंपरा बदलताना दिसत आहे. अनेकदा ज्यांना केवळ मुलगीच आहे, अशा पालकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलीच खंबीरपणे पुढे येऊन अंत्यसंस्काराचे विधी पूर्ण करतात. भारतीय न्यायव्यवस्थेने आणि अनेक आध्यात्मिक गुरूंनीही महिलांच्या या अधिकाराचे समर्थन केले आहे. "मुलगा आणि मुलगी एकसमान आहेत," हा विचार आता धार्मिक विधींमध्येही स्वीकारला जात आहे.
महिलांनी अंत्यसंस्कार करण्यामागची 5 महत्त्वाची कारणे
वारसा हक्क: जर कुटुंबात मुलगा नसेल, तर रक्ताचे नाते म्हणून मुलीला आपल्या पालकांचे अंत्यविधी करण्याचा पहिला अधिकार असतो.
आध्यात्मिक गरज: शास्त्रानुसार, मृतात्म्याला मुक्ती मिळण्यासाठी कोणीतरी अंत्यसंस्कार करणे आवश्यक असते. अशा वेळी स्त्री-पुरुष भेद करण्यापेक्षा विधी पूर्ण करणे अधिक महत्त्वाचे मानले जाते.
भावूक नाते: आई-वडिलांशी मुलीचे नाते अत्यंत जवळचे असते. शेवटच्या क्षणी आपल्या प्रिय व्यक्तीला निरोप देणे हा तिचा भावनिक अधिकार आहे.
विधी पूर्णता: गरुड पुराणात कठीण प्रसंगात कोणाकडूनही अंत्यसंस्कार करून घेण्याची मुभा दिली आहे, जेणेकरून मृतात्म्याला मोक्ष मिळावा.
अंधश्रद्धेला छेद: बदलत्या समाजात महिलांना स्मशानात जाण्यापासून रोखणे ही आता एक अंधश्रद्धा मानली जात आहे. शुद्ध मनाने केलेला कोणताही विधी देवाला मान्य असतो, असे मानले जाते.
स्मशानात जाताना घ्यायची काळजी
जर महिला अंत्यविधीसाठी स्मशानात जात असतील, तर त्यांनी काही नियम पाळणे गरजेचे मानले जाते. उदा. विधी पूर्ण झाल्यानंतर घरी येताना स्नान करणे, गंगाजल शिंपडणे आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहणे.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
