अनेक मराठी घरांमध्ये या काळात चैत्रगौरीचं हळदीकुंकू केलं जातं. कैरीची डाळ आणि पन्हं यांचा नैवेद्य चैत्रगौरीला दाखवला जातो. चैत्र नवरात्रीनिमित्त घटस्थापनेसाठी वापरलेल्या नारळाला कोंब येऊन त्याचं रोप तयार झालं तर त्याचा अर्थ काय असा प्रश्न अनेक नागरिकांना पडतो. आज त्याबाबत जाणून घेऊया.
चैत्रातील नवरात्र साजरं करण्यासाठी घटस्थापना केली जाते. या घटस्थापनेच्या विधीमध्ये एका कलशात नारळ ठेवून त्या कलशाची पूजा केली जाते. हा कलश नऊ दिवस स्थिर ठेवला जातो. कोणत्याही धार्मिक कार्यात नारळाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे.
advertisement
घटस्थापनाही त्याला अपवाद नाही. नारळ हा विष्णू आणि लक्ष्मी यांचं रुप मानलं जातो. नारळाशिवाय हिंदू धर्मातील कुठलीही पूजा किंवा धार्मिक कार्य पूर्ण होऊ शकत नाही. घटस्थापना करण्यासाठी वापरलेल्या नारळाला काही वेळा कोंब येऊन त्यातून रोप तयार होण्यास सुरुवात होते. त्यावेळी मनात कोणत्याही भल्याबुऱ्या शंका येण्याची गरज नसते. कारण तो एक शुभसंकेत मानला जातो.
कोणत्याही ठिकाणी नवीन जीव निर्माण होणं हे सात्विक आणि शुभ मानलं जातं. घटस्थापनेसाठी पूजलेला नारळ तरी याला अपवाद कसा असणार? नारळाला कोंब येऊन त्यातून रोप तयार होणं ही सकारात्मक गोष्ट आहे. तो सौभाग्याचा संकेतही मानला जातो. त्यातून प्रगतीचा संकेतही मिळतो.
विष्णू आणि लक्ष्मी यांनी नारळाचं झाड आणि कामधेनू या दोन गोष्टी पृथ्वीवर आणल्या असं मानलं जातं. त्यामुळे नारळाला कोंब आला तर त्याकडे विष्णूचा आशीर्वाद म्हणून पाहिलं जातं. नारळात लक्ष्मीचा वास असतो असंही मानलं जातं. त्यामुळे घटस्थापनेसाठी वापरलेल्या नारळाला कोंब आला तर तो लक्ष्मीचा आशीर्वाद समजला जातो.
एखाद्या व्यक्तीला आर्थिक चिंता भेडसावत असतील तर त्याची आर्थिक प्रगती होणार आहे असं मानलं जातं. थोडक्यात नारळाला आलेल्या कोंबाबद्दल मनात कोणताही गैरसमज न ठेवता त्याकडे प्रगती, समृद्धी आणि भरभराटीचं एक प्रतीक म्हणून पाहिलं जावं. नवरात्र संपल्यानंतर बागेत ते रोप लावून त्या आशीर्वादाचं तुम्ही जतन करु शकता.
