होलाष्टक म्हणजे काय?
होलाष्टक' हा शब्द 'होळी' आणि 'अष्टक' या दोन शब्दांपासून बनला आहे. फाल्गुन शुक्ल अष्टमीपासून ते पौर्णिमेपर्यंत हा काळ असतो. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून, या काळात ग्रहांची स्थिती अत्यंत उग्र असते. सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनी आणि राहू हे आठही ग्रह या काळात आपले शुभ प्रभाव गमावून बसतात किंवा नकारात्मक फळ देतात, असे मानले जाते.
advertisement
होलाष्टकात शुभ कार्ये का टाळावीत?
होलाष्टक अशुभ मानण्यामागे दोन मुख्य पौराणिक कथा सांगितल्या जातात. असे मानले जाते की, हिरण्यकश्यपूने या 8 दिवसांत भक्त प्रल्हादाला विष्णू भक्ती सोडण्यासाठी प्रचंड शारीरिक आणि मानसिक यातना दिल्या होत्या. या वेदनादायक काळामुळे होलाष्टकात आनंदाचे उत्सव साजरे केले जात नाहीत. पौराणिक कथेनुसार, महादेवाची समाधी भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कामदेवाला महादेवाने याच काळात आपल्या तिसऱ्या डोळ्याने भस्म केले होते. त्यामुळे हा काळ शोकाचा आणि नकारात्मक मानला जातो.
2 दिवसात कोणती कामे उरकून घ्यावीत?
नवीन वस्तूंची खरेदी: जर तुम्ही नवीन वाहन, सोने किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू घेण्याचा विचार करत असाल, तर 25 फेब्रुवारीपूर्वी खरेदी करा.
गृहप्रवेश किंवा वास्तू शांती: नवीन घरात राहायला जाण्यासाठी किंवा घराचे नूतनीकरण सुरू करण्यासाठी हे दोन दिवस शेवटचे शुभ मुहूर्त आहेत.
व्यापार आणि गुंतवणूक: नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा मोठ्या रकमेची गुंतवणूक करणे होलाष्टकात टाळले जाते, त्यामुळे ते आत्ताच पूर्ण करा.
लग्न-साखरपुड्याचे निर्णय: विवाहाची बोलणी किंवा साखरपुड्याचे विधी या दोन दिवसात करणे शुभ ठरेल.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
