मूर्तीला येतो घाम आणि शरीराचे तापमान
तिरुपति बालाजी मंदिरात भगवान व्यंकटेश्वराची मूर्ती साक्षात जिवंत असल्याचे मानले जाते. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे या मूर्तीचे तापमान. सामान्यतः दगडाच्या मूर्ती थंड असतात, परंतु तिरुपतीमधील मुख्य मूर्तीचे तापमान नेहमी 110 अंश फॅरेनहाइट (सुमारे 43 अंश सेल्सिअस) इतके असते. मंदिरात कितीही थंडी असली किंवा मूर्तीवर थंड पाण्याचा अभिषेक केला, तरी मूर्तीचे तापमान कमी होत नाही. विशेष म्हणजे, पूजेच्या वेळी मूर्तीला चक्क घाम येतो. हा घाम पुसण्यासाठी रेशमी कापडाचा वापर केला जातो. जेव्हा पुजारी मूर्तीला स्पर्श करतात, तेव्हा ती एखाद्या जिवंत मानवी शरीराप्रमाणे उबदार लागते, असे सांगितले जाते.
advertisement
तेल आणि तुपाशिवाय जळणारा अखंड दिवा
मंदिराच्या गाभाऱ्यात एक दिवा आहे जो गेल्या शेकडो वर्षांपासून सतत प्रज्वलित आहे. या दिव्याचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे यात तेल किंवा तूप कधीही टाकले जात नाही. तरीही हा दिवा कधीही विझत नाही. हा दिवा नेमका कधी लावला आणि तो कशाच्या आधारावर जळतो आहे, याचे उत्तर आजही कोणाकडे नाही. अनेक इतिहासकारांनी आणि संशोधकांनी यावर अभ्यास करण्याचा प्रयत्न केला, परंतु या दिव्यामागील ऊर्जा स्त्रोत शोधण्यात यश आले नाही. भाविकांच्या मते, हा साक्षात ईश्वरी प्रकाश आहे जो अनंत काळापासून मंदिराचे रक्षण करत आहे.
समुद्राच्या लाटांचा आवाज आणि अदृश्य शक्ती
व्यंकटेश्वराच्या मूर्तीशी संबंधित आणखी एक गुढ म्हणजे 'समुद्राच्या लाटांचा आवाज'. जर तुम्ही तुमचे कान प्रभू व्यंकटेश्वराच्या मूर्तीच्या पाठीला लावले, तर तुम्हाला समुद्राच्या लाटांचा स्पष्ट आवाज ऐकू येतो. ही मूर्ती नेमकी कशाची बनलेली आहे, हे आजही एक गुपित आहे. तसेच, मूर्तीवर चढवलेली फुले किंवा तुळशीची पाने पूजेनंतर मागे फेकली जातात. असे मानले जाते की, ही फुले थेट तिरुपतीपासून २० किमी अंतरावर असलेल्या एका धबधब्यात जाऊन मिळतात. मंदिराच्या स्वच्छतेसाठी आणि सजावटीसाठी वापरली जाणारी फुले कधीही बाहेर आणली जात नाहीत, ती गाभाऱ्यातील एका कुंडात विसर्जित केली जातात.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
