उपवास सोडण्याची अचूक वेळ
संकष्टी चतुर्थीच्या व्रताचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा उपवास 'चंद्रोदया'नंतरच सोडला जातो. सूर्योदयापासून सुरू झालेला हा उपवास रात्री चंद्र दर्शन झाल्याशिवाय पूर्ण मानला जात नाही. जोपर्यंत आकाशात चंद्र दिसत नाही आणि चंद्राला 'अर्घ्य' दिले जात नाही, तोपर्यंत उपवास सोडू नये. प्रत्येक शहरात चंद्रोदयाची वेळ वेगवेगळी असते, त्यामुळे स्थानिक पंचांग पाहूनच पूजेला सुरुवात करावी. जर ढगांमुळे चंद्र दिसला नाही, तर पंचांगातील वेळेनुसार चंद्राच्या दिशेला नमस्कार करून अर्घ्य द्यावे.
advertisement
कोणता पदार्थ खाऊन सोडावा उपवास?
उपवास सोडताना आपण काय खातो, याला आध्यात्मिक आणि आरोग्याच्या दृष्टीने मोठे महत्त्व आहे. गणपती बाप्पाला मोदक अत्यंत प्रिय आहेत. त्यामुळे उपवास सोडताना शक्य असल्यास प्रसादाचा मोदक खाऊनच अन्नाचा पहिला घास घ्यावा. यामुळे बाप्पाची कृपा सदैव राहते, अशी श्रद्धा आहे. उपवास सोडताना नेहमी सात्विक अन्नाचे सेवन करावे. यामध्ये वरण-भात, भाजी आणि पोळी यांचा समावेश असावा. विज्ञानाच्या दृष्टीनेही, दिवसभर रिकाम्या पोटी राहिल्यानंतर हलका आणि पौष्टिक आहार घेणे पचनासाठी उत्तम असते. संकष्टीच्या उपवासात अनेकजण दिवसभर मीठ खात नाहीत, त्यामुळे रात्री जेवताना सैंधव मिठाचा वापर करणे अधिक श्रेयस्कर मानले जाते.
'या' गोष्टी टाळा
उपवास सोडताना चुकूनही लसूण, कांदा, मांसाहार किंवा मद्यपानाचा समावेश नसावा. असे केल्याने व्रताचे पुण्य मिळत नाही. चंद्रोदयाची वेळ होण्यापूर्वी भूक लागली तरी अन्नाचे सेवन करू नका. फलाहार किंवा दूध घेऊन तुम्ही स्वतःला ऊर्जा देऊ शकता. उपवास म्हणजे केवळ अन्न सोडणे नव्हे, तर मनातील विकार सोडणे. त्यामुळे आजच्या दिवशी कोणाशीही वाद घालू नका.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
