भारतात ग्रहण नाही, त्यामुळे सुतकही नाही
प्रत्येक घरात विचारला जाणारा पहिला प्रश्न म्हणजे आज सुतक पाळायचे का? ज्योतिषीय परंपरेनुसार, ज्या प्रदेशात ग्रहण प्रत्यक्ष दिसत नाही, त्या ठिकाणी सुतक काळ लागू मानला जात नाही. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणारे हे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्याने सुतक पाळण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे देशभरातील मंदिरे नियमित वेळेत उघडी राहतील आणि नेहमीप्रमाणे पूजा-अर्चा सुरू राहणार आहे. पंडितांचे म्हणणे आहे की स्थानिक पातळीवर ग्रहण दिसल्यासच सुतकचे नियम लागू होतात. त्यामुळे आजचा दिवस सामान्य दिनचर्येसारखाच असेल.
advertisement
सूर्यग्रहणाची वेळ आणि कालावधी
भारतीय प्रमाणवेळेनुसार, आजचे सूर्यग्रहण दुपारी ३ वाजून २६ मिनिटांनी सुरू होईल आणि सायंकाळी ७ वाजून ५७ मिनिटांपर्यंत चालेल. एकूण कालावधी सुमारे ४ तास ३१ ते ३२ मिनिटांचा असेल. ग्रहणाचा सर्वोच्च टप्पा सायंकाळी साधारण ५ वाजून ४२ मिनिटांच्या सुमारास अपेक्षित आहे. या क्षणी चंद्र सूर्याच्या मध्यभागी येतो, मात्र सूर्य पूर्णपणे झाकला जात नाही. त्यामुळे सूर्याच्या कडेला तेजस्वी वलय दिसते, ज्याला “अग्नीचे वलय” असे म्हटले जाते. हाच या ग्रहणाचा सर्वात आकर्षक टप्पा मानला जातो.
‘अग्नीचे वलय’ कुठे पाहायला मिळेल?
जरी भारतात हे सूर्यग्रहण दिसणार नसले, तरी जगाच्या काही भागांमध्ये हे नेत्रदीपक दृश्य अनुभवता येईल. विशेषतः अंटार्क्टिकाच्या बहुतांश भागात आणि दक्षिण महासागर परिसरात हे कंकणाकृती सूर्यग्रहण स्पष्टपणे दिसेल. या भागांमध्ये सूर्याभोवती अग्नीच्या वलयासारखा प्रकाशमय कडा दिसणार असल्याने खगोलप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोनातून ग्रहणाचे महत्त्व
सूर्यग्रहण ही पूर्णपणे नैसर्गिक आणि वैज्ञानिक प्रक्रिया आहे. चंद्र पृथ्वी आणि सूर्य यांच्या मधोमध आल्याने हा खगोलीय प्रकार घडतो. याचा पृथ्वीवरील दैनंदिन जीवनावर कोणताही थेट अपायकारक परिणाम होत नाही, हे वैज्ञानिक स्पष्टपणे सांगतात. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता, योग्य माहितीच्या आधारे या घटनेकडे पाहणे गरजेचे आहे.
(सदर बातमी फक्त महितीकरीता असून न्यूज १८ मराठी कुठलाही दावा करत नाही)
