कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे नेमके काय?
17 फेब्रुवारी 2026 रोजी लागणारे सूर्यग्रहण हे कंकणाकृती स्वरूपाचे असणार आहे. या प्रकारच्या ग्रहणात चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो, मात्र सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही. परिणामी सूर्याच्या कडेभोवती तेजस्वी प्रकाशाचे वलय दिसते. या दृश्याला ‘अग्नीचे वलय’ असेही संबोधले जाते. खगोलप्रेमींमध्ये हे दृश्य अत्यंत आकर्षक मानले जाते आणि काही विशिष्ट भौगोलिक भागांत ते प्रत्यक्ष पाहता येते.
advertisement
वेळ आणि कालावधी
वर्षातील पहिले सूर्यग्रहण 17 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजून 26 मिनिटांनी (भारतीय प्रमाणवेळेनुसार) सुरू होईल. हे ग्रहण संध्याकाळी 7 वाजून 57 मिनिटांपर्यंत चालणार असून, त्याचा एकूण कालावधी सुमारे 4 तास 32 मिनिटांचा असेल. मात्र, हे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. त्यामुळे प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ भारतातील नागरिकांना मिळणार नसला तरी, धार्मिक संदर्भातून या घटनेचे महत्त्व कमी होत नाही.
माघ अमावस्या आणि सूर्यग्रहणाचा दुर्मिळ योग
माघ अमावस्या 16 फेब्रुवारी 2026 रोजी संध्याकाळी 5 वाजून 35 मिनिटांनी सुरू होईल आणि 17 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5 वाजून 31 मिनिटांपर्यंत राहील. उदया तिथीनुसार माघ अमावस्या 17 फेब्रुवारीलाच मानली जाणार आहे. त्यामुळे सूर्यग्रहण आणि अमावस्या हे दोन्ही योग एकाच दिवशी येत आहेत. धार्मिक दृष्टिकोनातून हा योग विशेष मानला जातो.
ग्रहणाच्या वेळी पूजा करता येईल का?
धार्मिक परंपरेनुसार, जेव्हा ग्रहण भारतात प्रत्यक्ष दिसते तेव्हाच सूतक काळ लागू होतो. 17 फेब्रुवारी 2026 चे सूर्यग्रहण भारतात दृश्यमान नसल्यामुळे सूतक काळ लागू होणार नाही. त्यामुळे माघ अमावस्येचे व्रत, पूजा-पाठ, तर्पण, पिंडदान आणि दानधर्म नेहमीप्रमाणे करता येईल. कोणत्याही शुभ कार्यावर या ग्रहणाचा अडथळा मानला जाणार नाही, असे जाणकार सांगतात.
माघ अमावस्येचे धार्मिक महत्त्व
माघ अमावस्या हा दिवस पितरांना समर्पित मानला जातो. या दिवशी पवित्र नदीत स्नान, तर्पण आणि दान केल्यास पितर प्रसन्न होतात, अशी श्रद्धा आहे. ज्यांच्या कुंडलीत पितृदोष आहे, त्यांनी या दिवशी विशेष विधी केल्यास त्याचे शुभ फल मिळते, असे मानले जाते. पितरांचे आशीर्वाद लाभल्यास घरात सुख-शांती, समृद्धी येते आणि अडलेली कामे मार्गी लागतात, अशी धार्मिक समजूत आहे.
ग्रहणकाळात आहाराबाबत काय नियम?
परंपरेनुसार ग्रहणकाळात काही आहार नियम पाळले जातात. या काळात शिजवलेले अन्न, मांसाहार, कांदा, लसूण तसेच पचनास जड पदार्थ टाळावेत, असे सांगितले जाते. ग्रहणाच्या काळात उपवास करणे उत्तम मानले जाते. काही खाणे आवश्यक असल्यास अन्नात तुळशीचे पान ठेवावे आणि हलके, सात्त्विक व द्रव पदार्थांचे सेवन करावे.
(सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज १८ मराठी कुठलाही दावा करत नाही)
