१५ फेब्रुवारी रोजी कोलंबो इथे होणाऱ्या या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची धमकी देणाऱ्या पाकिस्तानने आता नमती भूमिका घेतली. आयसीसीने वापरलेली कूटनीतिक आणि पाकिस्तानची केलेली कोंडा यामुळे अखेर नरमाईची भूमिका घेण्याशिवाय पाकिस्तानकडे दुसरा पर्याय उरला नाही.
नेमका वाद काय होता?
या वादाची ठिणगी पडली ती बांग्लादेशमुळे. सुरक्षेच्या कारणास्तव बांग्लादेशने भारतात येण्यास नकार दिला होता. या वादात पाकिस्तानने उडी घेत बांग्लादेशला पाठिंबा दिला आणि बांग्लादेशच्या सन्मानासाठी आम्ही भारतासोबतचा सामना खेळणार नाही, अशी धमकी १ फेब्रुवारी रोजी दिली. या भूमिकेमुळे भारत विरुद्ध पाकिस्तान सामना झाला नाही तर ICC चं आर्थिक गणित बिघडू शकतं हे लक्षात आल्यानंतर ICC ने पाकिस्तानला सुरुवातीला समजावण्याचे प्रयत्न केले. मात्र पाकिस्तान आपल्या भूमिकेवर ठाम होतं.
advertisement
आयसीसीची ट्रिपल अटॅक रणनीती
पाकिस्तानला रोखण्यासाठी आयसीसीने थेट संघर्षाऐवजी कूटनीतीचा वापर केला. ज्या देशांच्या नावाखाली पाकिस्तान राजकारण करत होता, त्याच देशांना आयसीसीने समोर केले. कोलंबोमध्ये हा सामना होणार असल्याने श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डाचे मोठे आर्थिक हित यात गुंतले आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष दिसानायके यांनी थेट पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी संवाद साधून जुन्या मैत्रीची आठवण करून दिली. एमिरेट्स क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानला आरसा दाखवला.
कठीण काळात पाकिस्तानचे होम ग्राउंड बनलेल्या यूएईने स्पष्ट केले की, अशा बहिष्कारामुळे क्रिकेटच्या अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान होईल. सर्वात मोठा धक्का बांग्लादेशने दिला. ज्यांच्यासाठी पाकिस्तान लढत होता, त्याच बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष लाहौरला पोहोचले आणि त्यांनी पाकिस्तानला क्रिकेटच्या हितासाठी हा सामना खेळण्याची विनंती केली.
पाकिस्तानचा नैतिक पराभव?
जेव्हा स्वतः बांग्लादेशनेच पाकिस्तानची साथ सोडली, तेव्हा मोहसिन नकवी आणि पीसीबीकडे कोणताही पर्याय उरला नाही. आयसीसीने बांग्लादेशवर कोणतीही कारवाई न करण्याचे आणि त्यांचे आर्थिक हित जपण्याचे आश्वासन दिल्यावर पाकिस्तानचे मनसुबे अपयशी झाले. अखेर, क्रिकेटमधील सर्वात मोठ्या कमाईच्या सामन्यासाठी पाकिस्तानने गुडघे टेकले आहेत. १५ फेब्रुवारीला कोलंबोचे आर. प्रेमदासा स्टेडियम भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे.
