आयपीएल 2026 च्या मोसमासाठी राजस्थान रॉयल्सने रियान पराग याला कर्णधार केलं आहे. राजस्थान रॉयल्सने कर्णधार म्हणून रियान परागच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. 24 वर्षांच्या रियान परागने याआधीही राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व केलं आहे. आयपीएलच्या मागच्या मोसमात संजू सॅमसनला दुखापत झाली होती, तेव्हा रियान पराग राजस्थानचा कर्णधार होता. पराग कर्णधार असताना खेळलेल्या 8 सामन्यांमध्ये राजस्थानला फक्त 2 सामन्यांमध्ये विजय मिळवता आला होता. कर्णधार असताना परागने 38.57 च्या सरासरीने रन केल्या, ज्यात केकेआरविरुद्ध त्याने 95 रनची खेळी केली. रियान परागचा आयपीएल करिअरमधला हा सर्वोत्तम स्कोअर होता.
advertisement
आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सची कामगिरी निराशाजनक राहिली. राजस्थानला 14 पैकी फक्त 4 सामन्यांमध्ये विजय मिळाला. यानंतर कोच राहुल द्रविड आणि संजू सॅमसनने राजस्थानची साथ सोडली. द्रविडच्या जागी राजस्थानने कुमार संगकाराची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
2019 साली पदार्पण केलेला रियान पराग पहिल्या मोसमापासून राजस्थानकडून खेळत आहे. आयपीएलच्या मागच्या दोन मोसमांमध्ये रियान परागला सर्व मॅच खेळण्याची संधी मिळाली. 2024 हा मोसम रियान परागसाठी सर्वोत्तम ठरला, ज्यात त्याने 52.09 ची सरासरी आणि 149.21 च्या स्ट्राईक रेटने 573 रन केले. आयपीएलच्या 84 सामन्यांमध्ये रियान परागने 1566 रन केले आहेत, याशिवाय त्याने 7 विकेटही घेतल्या.
मतभेदानंतर संजूने सोडली राजस्थानची साथ?
दुसरीकडे संजू सॅमसन राजस्थान रॉयल्सकडून 11 मोसम खेळला होता, पण आयपीएलच्या मागच्या मोसमात संजूचे राजस्थान रॉयल्ससोबत मतभेद झाल्याचं बोललं गेलं, त्यानंतर संजूने राजस्थानची साथ सोडल्याची चर्चा रंगली.
रियान परागमुळे संजूने राजस्थान सोडलं?
भारताचा माजी क्रिकेटपटू सुब्रमण्यम बद्रीनाथ याने रियान परागमुळे संजू सॅमसनने राजस्थानची साथ सोडल्याचा दावा केला होता. रियान परागचा तुम्ही कर्णधार म्हणून विचार करणार असाल, तर संजू टीममध्ये राहण्याची अपेक्षा तुम्ही कशी करता? असं सुब्रमण्यम बद्रीनाथ संजूने राजस्थानची साथ सोडली तेव्हा म्हणाला होता.
