विराट कोहलीला भारत रत्न द्या - सुरेश रैना
विराट कोहलीने मिळवलेल्या सर्व कामगिरीसाठी, त्याने भारत आणि भारतीय क्रिकेटसाठी जे काही केले आहे, त्यासाठी त्याला भारतरत्न देण्यात यावा, असं सुरेश रैना म्हणाला आहे. त्याने भारतीय क्रिकेटला दिलेल्या योगदानाबद्दल भारत सरकारने त्याला भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे, अशी मागणी सुरेश रैना याने स्टार्स स्पोर्ट्सशी बोलताना म्हटलं आहे.
advertisement
फक्त एकाच खेळाडूला मिळालाय भारतरत्न
भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'भारतरत्न' हा केवळ एकाच खेळाडूला देण्यात आला आहे. 2014 मध्ये क्रिकेटच्या देवाला म्हणजेच सचिन तेंडुलकरला हा सन्मान देण्यात आला होता. हा सन्मान मिळवणारा तो पहिला खेळाडू ठरला. त्यासोबतच, तो हा सन्मान मिळवणारा सर्वात तरुण व्यक्ती देखील ठरला. आता विराट कोहलीला हा पुरस्कार मिळणार का? असा सवाल विचारला जात आहे.
विराटला भारत सरकारकडून कोणते पुरस्कार मिळाले?
भारतीय क्रिकेट संघाचा प्रसिद्ध खेळाडू विराट कोहलीला भारत सरकारकडून अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले आहेत. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल आणि भारतीय क्रिकेटमधील योगदानाबद्दल त्याला हे सन्मान प्रदान करण्यात आले आहेत. विराट कोहलीला 2018 मध्ये भारताचा सर्वोच्च क्रीडा सन्मान, राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. आता या पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे आहे.
2017 मध्ये विराट कोहलीला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा भारतातील चौथा सर्वोच्च नागरी सन्मान आहे, जो विविध क्षेत्रांतील विशिष्ट योगदानासाठी दिला जातो. त्याआधी 2013 मध्ये विराट कोहलीला अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी भारत सरकारकडून दिला जातो आणि हा भारतातील दुसरा सर्वोच्च क्रीडा सन्मान आहे.
याव्यतिरिक्त, विराट कोहली यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (ICC) अनेक पुरस्कार मिळाले आहेत, जसं की 'ICC क्रिकेटर ऑफ द ईयर', 'ICC वनडे क्रिकेटर ऑफ द ईयर' आणि 'ICC टेस्ट क्रिकेटर ऑफ द ईयर'. तसेच, त्यांना 'BCCI पॉली उम्रीगर पुरस्कार' देखील अनेक वेळा मिळाला आहे.
