डोंबिवली स्टेशनच्या बाजीप्रभू चौकापासून ते एमआयडीसी निवासी वसाहतीपर्यंतच्या वातानुकूलित बससेवेला प्रवाशांची सर्वाधिक पसंती होती. ही बससेवा बंद झाल्यामुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. कल्याण- डोंबिवलीतील सर्व मार्गांवरील एसी बस सेवा शुक्रवारपासून ठप्प झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. ठाणे आणि नवी मुंबईमध्ये एसी लोकल ट्रेन आणि इतरत्र सेवांमधील प्रवाशांची संख्या वाढत असून एसी बस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. धक्काबुक्कीचा प्रवास आणि घामांच्या धारांमध्ये प्रवास करण्याऐवजी एसी बसमधून प्रवास करण्याचा पर्याय निवडला जात आहे.
advertisement
अनेक मिडिया रिपोर्ट्सनुसार, केडीएमसीमधील एसी बसचे कंत्राट मार्च महिन्यामध्ये संपले नसून कंत्राटदाराचा करार जवळपास आठ महिन्यांपूर्वीच संपल्याची माहिती आहे. त्यामुळे प्रशासकीय कारवाई आणि नियोजनातील विलंबावर प्रश्नचिन्ह निर्माण केला जात आहे. शुक्रवारी कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सुमारे 226 कोटी रुपयांचे परिवहन विभागासाठीचे बजेट सादर करण्यात आले. प्रवाशांच्या सुविधा सुधारण्यासाठी तब्बल 100 नवीन बसेसची भर घालण्याची घोषणा केली. मात्र, त्याच वेळी प्रवाशांच्या सेवेमध्ये असलेल्या सर्व एसी बसेसची सेवा अचानक बंद केल्यामुळे प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, महापालिकेकडून अचानक बस सेवा बंद करण्यात आल्यामुळे अनेक प्रवाशांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. नागरिकांनी आणि प्रवाशांनी लोकप्रतिनिधींना तातडीने कारवाई करून एसी बस सेवा लवकरात लवकर प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल करण्यात यावे, अशी विनंती केलेली आहे. डोंबिवली एमआयडीसीतील रहिवासी राजू नलावडे यांनी स्थानिक नगरसेवकांना या मुद्द्याला प्राधान्य देऊन सध्याच्या उन्हाळ्यात वातानुकूलित वाहतूक उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले आहे.
