महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) सध्या मुंबई- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माजीवाडा ते वडपे या मार्गाचे रुंदीकरण करण्याचे काम करत आहे. ठाणे खाडीवरील जुन्या साकेत पुलाची क्षमता दुपदरी असल्याने अनेकदा मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत होती. सकाळी आणि रात्री गर्दीच्या वेळी जड वाहनांमुळे इतर वाहनचालकांना बराच काळ अडकून पडावे लागत असे. पावसाळ्यात पुलावरील खड्डे अधिकच बिकट होत असल्याने ठाणे शहरातल्या वाहतुकीवर परिणाम व्हायचा.
advertisement
जुन्या पुलाला लागून असलेल्या नवीन चार पदरी पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे सुमारे 200 मीटर लांबीचा हा नवीन पूल तयार झाला आहे. त्याची भार सहन करण्याची क्षमता आणि सुरक्षितता तपासण्यासाठी सध्या अंतिम चाचण्या सुरू आहेत. अधिकाऱ्यांच्या मते, चाचण्या पूर्ण झाल्यानंतर पुढील दोन दिवसांत नवीन पुलावरून वाहतूक सुरू केली जाईल. नवीन वाहतूक आराखड्यानुसार, ठाण्याहून नाशिक, मुंब्रा, नवी मुंबई आणि भिवंडीकडे जाणारी वाहतूक नवीन साकेत पुलावर वळवली जाईल. नाशिक, मुंब्रा, नवी मुंबई आणि भिवंडीहून ठाण्याकडे जाणारी वाहतूक जुन्या पुलावरूनच सुरू राहील. या बदलामुळे वाहतूक व्यवस्थापन सुरळीत होईल आणि वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण येईल असा विश्वास अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.
