Success Story : 5 हार्वेस्टर,16 ट्रॅक्टर अन् 2 कोटी कांदा चाळ, कंपनीला लाजवेल असं तरुण शेतकऱ्यांनी केलं!
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
या गावातील तरुण शेतकऱ्यांनी एकत्र येऊन संयुक्त शेती करण्याचा विचार केला आणि हा विचार फक्त त्या शेतकऱ्यांपुरता मर्यादित न राहता संपूर्ण गावाचं नशीब पालटणारा ठरला.
पुण्यातील शिक्रापूरपासून काही अंतरावर असलेल्या जातेगाव येथील शेतकऱ्यांनी वर्षाला 8 कोटींचा टर्नओव्हर असणारी कंपनी उभी केली आहे. संघटित शक्ती काय बदल घडवून आणू शकते, हे या शेतकऱ्यांनी दाखवून दिलं आहे. या गावातील तरुण शेतकऱ्यांनी एकत्र येऊन संयुक्त शेती करण्याचा विचार केला आणि हा विचार फक्त त्या शेतकऱ्यांपुरता मर्यादित न राहता संपूर्ण गावाचं नशीब पालटणारा ठरला. हा प्रयोग त्यांनी कसा राबवला आणि वर्षाला 8 कोटींचा टर्नओव्हर असणारी कंपनी कशी उभी केली? याविषयी अभिजित मासालकर आणि महेंद्र खंडाळे यांनी लोकल 18 ला माहिती दिली.
advertisement
अभिजित मासालकर आणि महेंद्र खंडाळे यांनी सांगितले की, 2019 साली गावातील तरुण शेतकऱ्यांनी एकत्र येऊन संयुक्त शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यासोबतच शेतीतून जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी विविध प्रयोगही राबवण्यात आले. याच उद्देशाने त्यांनी ॲग्रो निर्मिती एक्सपोर्ट इनोव्हेशन फार्मर प्रोड्युसिंग कंपनी सुरू केली.
advertisement
कंपनीअंतर्गत 5 ते 6 हार्वेस्टर, 15–16 ट्रॅक्टर तसेच शेतीसाठी लागणारी इतर वाहने आणि अवजारे एकत्रितपणे खरेदी करण्यात आली. एकत्र खरेदीमुळे या सर्व वाहनांवर आणि अवजारांवर मोठा डिस्काउंट मिळाला. तसेच 9 कोटींचा कोल्ड स्टोरेज प्रकल्प, 4–5 कोटींचा भाजीपाल्याचा डीहायड्रेशन प्रकल्प आणि दीड ते दोन कोटींची कांदा चाळ उभी करण्यात आली.
advertisement
2019 साली कंपनीची सुरुवात झाली तेव्हा या कंपनीचे 133 सभासद होते. गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येत 25 लाख रुपयांचा निधी जमा करून ही कंपनी उभी केली. पहिल्याच वर्षी कंपनीचा टर्नओव्हर 65 लाख रुपये झाला. आज अवघ्या सात वर्षांत कंपनीचे सभासद वाढून 750 हून अधिक झाले असून कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर 8 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. कंपनीच्या माध्यमातून शेतीतून मिळणाऱ्या उत्पादनावर आधारित अनेक उपक्रम राबवले जात आहेत.
advertisement
यामध्ये डीहायड्रेशन प्लांट उभारण्यात आला असून विविध शेतीमालावर प्रक्रिया केली जाते. उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सोलर प्लांट उभारण्यात आला आहे. तसेच आधुनिक पद्धतीचा दीड हजार मेट्रिक टन क्षमतेचा कांदा स्टोरेज प्लांट आणि कोल्ड स्टोरेज उभारण्यात आले आहे. याशिवाय चार ऊस तोडणी यंत्रे खरेदी करण्यात आली असून एकूण 28 वाहनांच्या माध्यमातून व्यवसाय केला जात आहे. या सर्व उपक्रमांमुळे गावात मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती झाली आहे.








