Success Story : २३ वर्षाच्या सुरेशनं केली कमाल! 'या' पिकातून फक्त अर्धा एकरात कमवले ४ लाख रुपये
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Farmer Success Story : वाढत्या खर्चामुळे शेती तोट्याची ठरत असल्याची भावना अनेक शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
मुंबई : वाढत्या खर्चामुळे शेती तोट्याची ठरत असल्याची भावना अनेक शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. मात्र, योग्य नियोजन, मेहनत आणि आधुनिक पद्धतींचा वापर केल्यास शेतीतूनही चांगले उत्पन्न मिळवता येते, चंद्रपूर जिल्ह्यातील वणी खुर्द येथील २३ वर्षीय युवा शेतकरी सुरेश बाबू बाचीफळे यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे. अवघ्या अर्ध्या एकरात टोमॅटोचे पीक घेत त्यांनी तब्बल ४ लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
शिक्षणासोबत शेतीचा धाडसी निर्णय
सुरेश सध्या एम.ए.चे शिक्षण घेत असतानाच त्यांनी शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. नोकरीच्या मागे न लागता स्वतः काहीतरी वेगळे करण्याची जिद्द त्यांच्यात होती. पारंपरिक पिकांपेक्षा भाजीपाला शेती अधिक फायदेशीर ठरू शकते, याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी टोमॅटो लागवडीचा पर्याय निवडला. ५ सप्टेंबर रोजी त्यांनी अर्ध्या एकर क्षेत्रात टोमॅटोची लागवड केली.
advertisement
सुरुवातीच्या अडचणींवर मात
लागवडीच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. हवामानातील बदल, कीड-रोगांचा प्रादुर्भाव आणि व्यवस्थापनातील अडथळे अशा अनेक आव्हानांवर मात करत त्यांनी आपले लक्ष पिकाच्या गुणवत्तेकडे केंद्रित केले. कुटुंबियांचे सहकार्य आणि स्वतःची चिकाटी यामुळे त्यांनी शेतीत सातत्य राखले. योग्य प्रमाणात खतांचा वापर, नियोजित पाणीपुरवठा आणि प्रभावी कीड नियंत्रण यामुळे टोमॅटो पिकाची गुणवत्ता उत्कृष्ट राखण्यात त्यांना यश आले.
advertisement
कमी कालावधीत भरघोस उत्पादन
लागवडीनंतर अवघ्या दोन महिन्यांतच उत्पादनास सुरुवात झाली. बाजारपेठेत टोमॅटोला चांगला दर मिळाल्याने त्यांच्या उत्पन्नात मोठी भर पडली. सरासरी ३० ते ४० रुपये प्रति किलो दराने विक्री होत असल्याने प्रत्येक तोडणीत सुमारे १०० कॅरेट उत्पादन मिळू लागले. संपूर्ण हंगामात त्यांनी २० ते २५ टनांपर्यंत उत्पादन घेतले. उत्पादन खर्च वजा जाता जवळपास ४ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाल्याने सुरेश यांचे हे यश विशेष ठरले आहे.
advertisement
तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण
सुरेश यांच्या यशामुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांमध्येही सकारात्मक बदल दिसून येत आहे. आजच्या काळात अनेक उच्चशिक्षित युवक नोकरीकडे अधिक आकर्षित होतात. मात्र, शेतीत आधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य नियोजनाचा वापर केल्यास तीही एक फायदेशीर व्यवसाय ठरू शकते, हे त्यांनी सिद्ध केले आहे. त्यांच्या या प्रयोगामुळे गावातील इतर तरुणांनाही शेतीकडे वळण्याची प्रेरणा मिळत आहे.
advertisement
रोजगारनिर्मितीतही मोलाचा वाटा
याशिवाय, त्यांच्या शेतात कामासाठी काही स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे केवळ स्वतःचे उत्पन्न वाढवण्यापुरतेच नव्हे, तर इतरांनाही रोजगार देण्याचे काम सुरेश करत आहेत. त्यांच्या या यशस्वी प्रयोगामुळे शेतीबद्दलची नकारात्मक मानसिकता बदलण्यास मदत होत असून, ग्रामीण भागात नव्या आशा आणि संधी निर्माण होत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 04, 2026 7:06 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
Success Story : २३ वर्षाच्या सुरेशनं केली कमाल! 'या' पिकातून फक्त अर्धा एकरात कमवले ४ लाख रुपये






