शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली! या जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित विहिरींसाठी निधी आला, तालुकानिहाय किती पैसे मिळणार?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : सन २०२५-२६ च्या खरीप हंगामात झालेल्या मुसळधार पावसामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता.
अहिल्यानगर : सन २०२५-२६ च्या खरीप हंगामात झालेल्या मुसळधार पावसामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. अतिवृष्टीमुळे अनेक भागांतील शेत विहिरी गाळाने पूर्णपणे बुजल्या, तर काही विहिरी खचून वापरायोग्य राहिल्या नव्हत्या. परिणामी रब्बी हंगामात सिंचनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा देणारा निधी मंजूर केला आहे.
४३७ विहिरींसाठी ६३ लाखांचा निधी
शासनाने जिल्ह्यातील एकूण ४३७ बाधित शेत विहिरींच्या दुरुस्तीसाठी ६३ लाख १० हजार ६८३ रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीमुळे शेतकऱ्यांना विहिरींची दुरुस्ती करून पुन्हा शेतीसाठी पाण्याची उपलब्धता निर्माण करता येणार आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या मदतीमुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.
प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश वाटप
या मदतीचे वितरण गुरुवारी पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात सहा शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश देऊन मदतीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयाने उर्वरित पात्र शेतकऱ्यांना निधीचे वाटप १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
advertisement
अतिवृष्टीने शेतकऱ्यांवर संकट
खरीप हंगामात झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागांत पाणी साचून राहिले. याचा थेट फटका विहिरींना बसला. काही विहिरींमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला, तर काही ठिकाणी विहिरींचे बांधकाम खचल्याने त्या धोकादायक ठरल्या. परिणामी रब्बी हंगामात पिकांना पाणी देणे अवघड झाले होते. अनेक शेतकऱ्यांना पाणी टँकरवर अवलंबून राहावे लागले होते.
advertisement
शासन निर्णयानुसार मदत
या परिस्थितीचा आढावा घेत राज्य शासनाच्या नियोजन विभागाने १३ ऑक्टोबर २०२५ रोजी शासन निर्णय जारी केला. या निर्णयानुसार अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेत विहिरींच्या दुरुस्तीसाठी विशेष आर्थिक मदत देण्याचे ठरवण्यात आले. प्रत्यक्ष दुरुस्तीवर झालेला खर्च किंवा कमाल ३० हजार रुपये, यापैकी जी रक्कम कमी असेल ती मदत म्हणून देण्यात येणार आहे. या निकषांनुसारच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निधी मंजूर करण्यात आला आहे.
advertisement
तालुकानिहाय निधीचे वितरण
जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये मंजूर करण्यात आलेला निधी पुढीलप्रमाणे आहे.
जामखेड तालुक्यातील १२८ विहिरींसाठी १८ लाख ६८ हजार ७८ रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
शेवगाव तालुक्यातील १११ विहिरींसाठी १६ लाख ४८ हजार २०६ रुपये देण्यात येणार आहेत.
राहुरी तालुक्यातील ४९ विहिरींसाठी ७ लाख ३२ हजार ८४४ रुपये मंजूर झाले आहेत.
advertisement
श्रीरामपूर तालुक्यातील ४६ विहिरींसाठी ६ लाख ६० हजार ६०३ रुपये निधी देण्यात आला आहे.
नेवासा तालुक्यातील ४३ विहिरींसाठी ५ लाख १० हजार ८६४ रुपये मंजूर आहेत.
संगमनेर तालुक्यातील २१ विहिरींसाठी ३ लाख १४ हजार ७६ रुपये देण्यात येणार आहेत.
कोपरगाव तालुक्यातील १२ विहिरींसाठी ४ लाख ४ हजार ४०० रुपये, तर पारनेर तालुक्यातील १२ विहिरींसाठी १ लाख ७१ हजार ६१२ रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 10, 2026 11:42 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली! या जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित विहिरींसाठी निधी आला, तालुकानिहाय किती पैसे मिळणार?






