किती शेतकऱ्यांना लाभ?
राज्यातील तब्बल ९२ लाख ९१ हजार शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात २ हजार रुपये जमा होतील. यासाठी राज्य सरकारने १ हजार ९३२ कोटी ७२ लाख रुपयांची तरतूद केली असून नुकतीच त्याला मंजुरी दिली आहे.
केंद्र आणि राज्य सरकारचा दुहेरी लाभ
केंद्र सरकारची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-Kisan) अंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना ६ हजार रुपये दिले जातात. राज्य सरकारने त्यात आणखी ६ हजार रुपयांची भर घालत ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना सुरू केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना एकूण १२ हजार रुपयांचा थेट आर्थिक फायदा मिळतो.
advertisement
केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता २ ऑगस्ट रोजी वितरित केला होता. त्या पाठोपाठ राज्य सरकारचा हा सातवा हप्ता दिला जात आहे. यापूर्वीचे सहा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात यशस्वीरीत्या जमा करण्यात आले आहेत.
हप्ता मिळाला का कसा तपासाल?
शेतकऱ्यांना आपला हप्ता जमा झाला आहे का हे ऑनलाईन तपासण्याची सोय उपलब्ध आहे. त्यासाठी NSMNY या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. संकेतस्थळावर Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करावे.
लॉगिन करण्यासाठी तीन पर्याय उपलब्ध आहेत जसे की, नोंदणी क्रमांक, आधार क्रमांक किंवा आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक. योग्य पर्याय निवडून मोबाईल क्रमांक टाकावा व दिलेला कॅप्चा कोड भरावा. Get Aadhaar OTP या पर्यायावर क्लिक केल्यावर नोंदणीकृत मोबाईलवर ओटीपी येईल. तो ओटीपी भरून व्हेरिफिकेशन पूर्ण करावे. यानंतर शेतकऱ्यांचा Beneficiary Status स्क्रीनवर दिसून येतो. यात नाव, नोंदणी क्रमांक, मोबाईल नंबर, आतापर्यंत मिळालेले हप्ते याची संपूर्ण माहिती उपलब्ध होते. जर Eligibility Details हा पर्याय दिसला तर शेतकरी योजनेसाठी पात्र आहे असे समजते. पण Ineligibility असे दिसल्यास तो शेतकरी अपात्र ठरलेला आहे. त्यामागील कारण देखील येथे नमूद केलेले असते.
शेतकऱ्यांसाठी दिलासा
पावसाळा अनिश्चित असल्याने शेतकऱ्यांना कर्जाचा भार, मजुरांचा खर्च आणि इतर अडचणींना सामोरे जावे लागते. अशा वेळी नमो शेतकरी योजनेतून मिळणारे हे आर्थिक साहाय्य महत्त्वाचे ठरते. छोट्या-मोठ्या गरजा पूर्ण करण्यासाठी व कुटुंबाला दिलासा देण्यासाठी या हप्त्याची मदत होणार आहे.
दरम्यान, राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज २ हजार रुपयांचा सातवा हप्ता जमा होणार आहे. केंद्र व राज्य सरकारकडून मिळणाऱ्या या दुहेरी योजनेमुळे शेतकऱ्यांना वर्षाकाठी १२ हजार रुपयांचा फायदा होतो. ऑनलाईन सोयीमुळे हप्ता जमा झाला का? हे शेतकरी सहज तपासू शकतात.