बाळासाहेब यांच्याकडे एकूण २० गुंठे शेती आहे. या जमिनीत त्यांनी पेरू, आंबा, चिकू आणि फुलझाडांची लागवड केली आहे. मात्र २०२० साली त्यांनी प्रयोग म्हणून ४ गुंठ्यात पुदिन्याची शेती सुरू केली. विशेष म्हणजे त्यांनी या पिकासाठी कोणत्याही रासायनिक खतांचा किंवा कीटकनाशकांचा वापर न करता पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीचा अवलंब केला. त्यामुळे त्यांच्या पुदिन्याला चव आणि सुगंधाच्या बाबतीत बाजारात विशेष मागणी निर्माण झाली.
advertisement
आठवडी बाजारातून थेट विक्री
पुदिना हे नाजूक पीक असल्याने त्याला नियमित पाणी आवश्यक असते. बाळासाहेब बोअरवेलच्या माध्यमातून सिंचन करत राहिले. त्यांनी दलालांमार्फत विक्री करण्याऐवजी थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला. अंबाजोगाईच्या आठवडी बाजारात ते स्वतः पुदिना विकू लागले. या पद्धतीमुळे त्यांना दरमहा सुमारे १० हजार रुपयांचे स्थिर उत्पन्न मिळू लागले. गेल्या पाच वर्षांत या उत्पन्नाने ५ लाखांचा टप्पा पार केला आहे.
‘कमी खर्च, जास्त नफा’ मॉडेल
बाळासाहेब आणि त्यांच्या मुलाने मिळून कमी खर्चात अधिक नफा देणारे मॉडेल उभे केले आहे. अल्प क्षेत्रात योग्य नियोजन, सेंद्रिय शेती आणि थेट विक्री या तिन्ही गोष्टींच्या एकत्रित वापरामुळे त्यांनी छोट्या जमिनीला नफ्याचे साधन बनवले. त्यांच्या या प्रयोगामुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळत आहे.
कोविड काळात मिळाली दिशा
कोविड-१९ महामारीच्या काळात पुदिन्याचे औषधी महत्त्व लक्षात आल्यानंतर त्यांनी या पिकाकडे वळण्याचा निर्णय घेतला. सध्या ते आठवड्यातून दोन दिवस बाजारात विक्री करतात आणि वर्षाला सुमारे १ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवतात. उर्वरित जमिनीत त्यांनी विविध फळझाडांची लागवड करून उत्पन्नाचे विविध स्रोत तयार केले आहेत.
वर्षभर असलेली मागणी
पुदिन्यामध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे त्याला वर्षभर मागणी असते. चहा, चटणी, पाणीपुरी, बिर्याणी, ज्यूस आणि फास्टफूडमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. कमी गुंतवणूक, मर्यादित जागा आणि सततची मागणी यामुळे पुदिना हे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर नगदी पीक ठरत आहे.
