बीड - कमीत कमी जमिनीत जास्तीत जास्त उत्पन्न घेणाऱ्या अनेक शेतकऱ्यांबद्दल तुम्ही ऐकले असेल. आज अशाच एका शेतकऱ्याची कहाणी आपण जाणून घेणार आहोत, ज्यांनी फक्त 18 गुंठे क्षेत्रात पालेभाज्यांची शेती करुन चांगली कमाई करुन दाखवली आहे.
पंडित चव्हाण असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते बीड जिल्ह्यातील लोणगाव येथील रहिवासी आहेत. ते पालेभाज्याची शेती करतात. फक्त 18 गुंठे एवढ्या क्षेत्रामध्ये ते पालेभाज्याची लागवड करतात. पारंपारिक पिके परवडत नव्हती आणि त्याचबरोबर पंडित चव्हाण हे ऊसतोड कामगार म्हणूनही काम करत होते. ऊसतोड कामगार म्हणून काम करताना काहीतरी वेगळे करता यावे यासाठी ते सतत प्रयत्नशील होते. परंतु त्यांना काही पर्याय सापडत नव्हते.
advertisement
जमिनीचे क्षेत्र कमी होते आणि असे असताना त्यांना पारंपारिक पिके पडत नव्हती. 3 वर्षांपूर्वी त्यांना कल्पना सुचली आणि त्यांनी पालेभाज्यांची लागवड करायचे ठरवले. यानंतर मात्र, एक ते दोन महिने त्यांना पाहिजे तेवढे उत्पन्न मिळत नव्हते. परंतु हळूहळू पालेभाज्याच्या किरकोळ विक्रीतून त्यांना चांगले उत्पन्न मिळू लागलं. हा व्यवसाय फक्त 18 गुंठ्यांमध्ये असल्याने त्यांना उत्पन्नाच्या बाबतीत समाधान मिळत आहे.
ऐशोआरामात जगण्यासाठी केलं मोठं कांड, 'त्या' पैशातून आयफोन, पल्सर खरेदी, शेवटी अकडलेच!
पंडित चव्हाण यांनी पालेभाज्यांमध्ये मिरची, कोथिंबीर, भेंडी आणि इतर पालेभाज्यांची लागवड करत स्वतःला सक्षम बनवले आहे. पालेभाज्यांचे व्यवसायामध्ये चांगलं उत्पन्न मिळू लागल्याने त्यांनी ऊस तोडणीचे काम देखील सोडून दिले. फक्त 18 गुंठ्यांमध्ये पालेभाज्यांच्या शेतीतून पंडित चव्हाण यांना कमीत कमी अडीच लाखांपर्यंतचा नफा मिळतो, असे त्यांनी सांगितले. कमी क्षेत्रातही चांगले उत्पन्न मिळवता येते, हे त्यांनी सिद्ध करुन दाखवले आहे.