सांगली - भात पिकाचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिराळा तालुक्यात विविध प्रकारच्या भाताचे उत्पादन घेतले जाते. इथल्या पोषक वातावरणात आधुनिक वाणांचे भातही उत्तम पिकतात. तुलनेने भरपूर उत्पन्न देणारी आधुनिक बियाणे असताना शिराळकरांनी पूर्वीपासूनच 'शिराळी मोठा भात' बियाणे जतन केले आहे. नेमकं काय आहे यामागचे कारण, याचबाबत आपण आज जाणून घेणार आहोत.
advertisement
भात उत्पादक शेतकरी संजय पाटील यांनी याबाबत सविस्तर आणि महत्त्वाची माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, "शिराळी मोठा भात यालाच शिराळी दोडके भात म्हणून ओळखले जाते. हा आमच्याकडील पारंपारिक बियाणातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. हा तांदूळ थोडा जाडसर असतो. याचे मार्केट इतर तांदळांप्रमाणे असते. इंद्रायणी, बासमती प्रमाणे सुवासिक नसतो. परंतु चवीला अतिशय चविष्ट असतो.
विशेष आहे कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व, अभ्यासकांनी सांगितली ही महत्त्वाची माहिती
दूध-भात खाण्यासाठी हा तांदूळ शिराळ्यात प्रसिद्ध आहे. मार्केटमध्ये चिरमुरे बनवण्यासाठी या तांदळाला मागणी असते. याला दर इतर तांदळांप्रमाणे मिळतो. परंतु आधुनिक बियाण्यांच्या तुलनेत याचे उत्पादन कमी असल्याने अलीकडे शेतकरी याच्याकडे पाठ फिरवतात. तरीही घरगुती वापरासाठी आणि बियाणे टिकवण्यासाठी शेतकरी शेताच्या एका तुकड्यांमध्ये शिराळे दोडके भाताची लागण करतात. याचे बियाणे कोणत्याही दुकानांमध्ये मिळत नाही. शेतकरी कामठाच्या टोपलीमध्ये पारंपारिक पद्धतीने याचे जतन करतात आणि एकमेकांना उसने देऊन घेऊन या बियाणाचे जतन केले आहे," असेही त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, शिराळ्यात आजही ठिकठिकाणी शिराळी मोठा भात केल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात या भाताचे उत्पन्न जरी मोठ्या प्रमाणात नसले तरी बियाणाचे जतन करण्यासाठी हे पीक शेतकऱ्यांकडून घेतले जाते. तालुक्यात खरीप हंगामात भात पिकाची लागवड केली जाते. टोकण, रोपण, तसेच कुरीच्या साहाय्याने भाताचे पीक पेरले जाते.
या भाताचा तांदूळ थोडा जाडसर असतो. हे भात परिपक्व होण्यासाठी तीन ते साडेतीन महिन्यांचा कालावधी लागतो. मार्केटमध्ये विशेषतः चिरमुरे बनविण्यासाठी या तांदळाला मागणी असते. शेतकरी घरगुती पद्धतीने या बियाण्याची निर्मिती करत एकमेकांमध्ये देवघेव करतात. शिराळी मोठा भात हे अत्यंत दुर्मिळ प्रजातीतील बियाणे शिराळ्यातील शेतकऱ्यांनी जतन केल्याचे याठिकाणी दिसून येते.