स्थिर भावामुळे समाधान
परतूर बाजारात गव्हाला योग्य भाव, सोयाबीनने आपली झेप कायम ठेवली आणि ज्वारीलाही स्थिर दर मिळाले. मालाची आवक मर्यादित असली तरी शेतकऱ्यांनी आणलेला माल योग्य भावात विकला गेला. या स्थिरतेमुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, जर हीच स्थिती कायम राहिली आणि लवकरच नवीन सोयाबीन बाजारात दाखल झाल्यानंतरही दर स्थिर राहिले, तर त्यांना मोठा फायदा होऊ शकतो.
advertisement
शनिवारी परतूर बाजारातील भाव
गहू : किमान दर २,१८९, रु कमाल दर २,२५० रु सरासरी दर २,२६३ रु मिळाला.
ज्वारी (पांढरी) : किमान दर २,००० रु कमाल दर २,२२६ रु तर सरासरी दर २,२२५ रु मिळाला.
सोयाबीन (पिवळा) : किमान दर ४,२०० रु कमाल दर ४,६७० रु टर सरासरी दर ४,३५० रु मिळाला.
हे दर मागील काही दिवसांच्या तुलनेत स्थिर राहिल्याचे बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
व्यापाऱ्यांचे मत काय?
व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, “शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा संबंध हा उन्हातल्या सावलीसारखा आहे. योग्य नियोजन झाले तर दोघांनाही फायदा होतो. श्रावण महिन्यात सण-उत्सवामुळे खरेदी-विक्रीला चांगली चालना मिळते. मात्र शासनाच्या निर्बंधांमुळे काही प्रमाणात व्यापार मर्यादित होतो.”
शेतकऱ्यांच्या भावना
शेतकऱ्यांनी मात्र शासनाकडे अधिक ठोस उपाययोजनांची मागणी केली आहे. एका शेतकऱ्याने सांगितले, “आमच्याकडे गहू, ज्वारी, सोयाबीन, तूर, कापूस असतो तेव्हा भाव पडतात. पण माल विकून संपला की दर वाढतात. यात व्यापारी फायदा करून घेतात आणि शेतकरी मात्र वर्षभर तोट्यात राहतो. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थिर दर निश्चित करणे गरजेचे आहे.”
सध्या गहू, ज्वारी आणि सोयाबीनला समाधानकारक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी शेतकरी आणि व्यापारी यांच्यातील असमतोल स्पष्ट जाणवत आहे. दर स्थिर ठेवण्यासाठी व शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने ठोस पावले उचलणे हीच काळाची गरज असल्याचे मत शेतकरी आणि व्यापारी दोघांनीही व्यक्त केले.
