मुंबई : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Yojana) लाभ अद्याप न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. विविध तांत्रिक, कागदपत्रातील किंवा मालकी हक्कातील अडचणींमुळे योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता पुन्हा एकदा या योजनेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. शासनाने नव्याने लाभार्थी समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू केल्याने लाखो शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदतीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
advertisement
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण 12 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. यामध्ये केंद्र सरकारकडून 6 हजार रुपये आणि राज्य सरकारकडून 6 हजार रुपये दिले जातात. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात तीन समान हप्त्यांमध्ये जमा केली जाते. शेतीसाठी लागणारा खर्च, बियाणे, खत, औषधे तसेच कुटुंबाच्या दैनंदिन गरजांसाठी ही मदत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरते. मात्र, अनेक शेतकरी विविध कारणांमुळे या योजनेपासून आजपर्यंत वंचित राहिले होते.
कुणाला करता येणार अर्ज?
शासनाच्या माहितीनुसार, कागदपत्रांमधील त्रुटी, आधार-बँक खात्याची लिंक नसणे, जमिनीच्या नोंदींमध्ये नावात तफावत, शेतीचा वारसा बदल, शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर मालकी हस्तांतरण न होणे, अशा अनेक कारणांमुळे मोठ्या संख्येने शेतकरी या योजनेच्या लाभापासून दूर राहिले होते. अशा सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि त्यांनाही आर्थिक मदतीचा आधार मिळावा, या उद्देशाने शासनाने नव्याने अर्ज स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
या योजनेंतर्गत लहान व अल्पभूधारक शेतकरी अर्ज करू शकतात. अर्जदार शेतकऱ्याचे नाव राज्य किंवा केंद्र सरकारच्या अधिकृत जमिनीच्या नोंदीमध्ये असणे आवश्यक आहे. तसेच आधार कार्ड, बँक खाते आणि मोबाइल क्रमांक एकमेकांशी जोडलेले असणे बंधनकारक आहे. या अटी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करता येणार आहे.
नोंदणी कशी करायची?
नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून शेतकऱ्यांना अधिकृत संकेतस्थळ https://pmkisan.gov.in/homenew.aspx वर जाऊन अर्ज करता येईल. यासाठी ‘नवीन शेतकरी नोंदणी’ हा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर संबंधित राज्याची निवड करून आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक टाकावा लागेल. मोबाइलवर येणारा ओटीपी नोंदवल्यानंतर अर्जाची प्रक्रिया पुढे जाईल. यामध्ये शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती, जमिनीचा तपशील, बँक खाते क्रमांक आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती भरून अर्ज सबमिट करावा लागेल.
