शेतकऱ्यांच्या समस्या ऐकल्या
धुळे दौऱ्यावर जात असताना मुख्यमंत्र्यांनी जळगाव येथे थोडा वेळ थांबून शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत आपली व्यथा मांडली. त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, कायद्याच्या चौकटीत राहून जास्तीत जास्त नुकसानभरपाई देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांवर आलेले संकट मोठे असून, त्यातून त्यांना उभारी देणे ही सरकारची जबाबदारी आहे.
advertisement
पंचनामे आणि अडचणी
सध्या प्रशासनाकडून पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, राज्यात पुन्हा सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे ही प्रक्रिया काही ठिकाणी विलंबाने होत आहे. अहवाल वेळेवर न आल्यास ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या निर्णयाला उशीर होऊ शकतो. तरीही सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला.
ढगफुटी आणि अतिवृष्टीचा फटका
यंदा अनेक जिल्ह्यांत सलग पावसाचे सत्र, ढगफुटी आणि अतिवृष्टी झाली. परिणामी शेतकऱ्यांचे लाखो हेक्टर क्षेत्रातील पिके उध्वस्त झाली. अनेक घरांची छपरे उडाली, रस्ते वाहून गेले आणि नद्या-नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने जनजीवन विस्कळीत झाले. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर याचा मोठा परिणाम झाला आहे.
ओला दुष्काळ जाहीर कधी जाहीर होणार?
नुकसानीचा अंतिम पंचनामा अहवाल आल्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हंटले आहे.
आजही अतिमुसळधार पावसाचा इशारा
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. शनिवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांत मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाची नोंद झाली असून, लातूरच्या अहमदपूरमध्ये तब्बल १७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, हवामान विभागाने आज (ता. २८ सप्टेंबर) कोकणपट्टी, पुणे व नाशिकच्या घाटमाथ्यासह अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.