सागरी वाहतुकीत अनिश्चिततेचे वातावरण
युद्धजन्य परिस्थितीमुळे सागरी वाहतुकीत प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. आखातातील काही सागरी मार्गांवर जहाजांवर हल्ल्याचा धोका वाढल्याने अनेक आंतरराष्ट्रीय शिपिंग कंपन्यांनी त्या मार्गांवर मालवाहतूक तात्पुरती थांबवली आहे. परिणामी, जेएनपीएतून आखाती देशांकडे जाणारी निर्यात जवळपास ठप्प झाली आहे. काही जहाजांना तर मार्गातच माघारी फिरण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
advertisement
निर्यातीचा माल बंदरातच अडकला
जेएनपीए बंदरातून नियमितपणे इराक, सौदी अरेबिया आणि कतार यांसारख्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर फळे व भाजीपाला निर्यात केला जातो. मात्र सध्याच्या युद्धस्थितीमुळे शिपिंग कंपन्या आखातात जहाजे पाठवण्यास पुढे येत नसल्याने निर्यातीसाठी तयार असलेला माल बंदरातच साठून राहिला आहे. नाशवंत माल असल्याने त्याच्या गुणवत्तेवर आणि किमतीवरही परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
६० टक्के व्यापार धोक्यात
निर्यातदार राहुल पवार यांनी सांगितले की, “शिपिंग कंपन्या निर्यातीसाठी पुढे येत नसल्याने कृषी व्यापाराला मोठा फटका बसला आहे. सध्या आयात–निर्यातीवर सुमारे ६० टक्के परिणाम झाला असून, ही स्थिती काही काळ टिकली तर शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.” विशेषतः कांदा, केळी आणि द्राक्षांसारख्या वेळेवर पाठविणे आवश्यक असलेल्या पिकांसाठी ही स्थिती चिंताजनक मानली जात आहे.
बंदर प्रशासनाची प्रतिक्रिया
जेएनपीएतून दर आठवड्याला साधारण ५४ मालवाहू जहाजांची ये-जा होते. सध्या काही जहाजे उशिरा येत असून काहींचे वेळापत्रक रद्द करण्यात आले आहे. युद्धाचा संपूर्ण परिणाम स्पष्ट होण्यासाठी अजून काही दिवस लागतील, अशी प्रतिक्रिया बंदर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून, शिपिंग कंपन्यांशी संपर्क साधून पर्यायी मार्गांचा विचार केला जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सुरक्षाविषयक सूचना आणि पुढील आव्हाने
मध्यपूर्वेत तणाव वाढल्याने भारत सरकारच्या दूतावासांनी त्या भागात वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सुरक्षाविषयक सूचना जारी केल्या आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले आहे.
एकूणच आखाती युद्धाचा फटका केवळ आंतरराष्ट्रीय राजकारणापुरता मर्यादित न राहता आता थेट देशातील कृषी व्यापार, शेतकरी आणि निर्यातदारांच्या अर्थकारणावर बसू लागला आहे. परिस्थिती लवकरच पूर्ववत न झाल्यास येत्या दिवसांत त्याचे परिणाम अधिक तीव्रतेने जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
