या प्रकरणातील कथित पीडित तरुणी गायत्री पाटील हीच आपल्या वडिलांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरल्याची माहिती समोर आली आहे. एवढंच नव्हे तर तिची कुठेच विक्री झाली नव्हती. उलट आरोपी गायत्री हीच एका टोळीशी संगनमत करून अनेकांची फसवणूक करत असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी गायत्रीसह चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी गायत्री पाटीलला ताब्यात घेतलं आहे.
advertisement
नेमकं प्रकरण काय?
काही दिवसांपूर्वी जळगावमधील गायत्री पाटील या तरुणीला नोकरीच्या बहाण्याने नाशिक येथे घेऊन जात दोन महिलांनी आणि त्यांच्या साथीदारांनी कोल्हापूर येथे दोन लाखांत विक्री करून बळजबरी विवाह केल्याची घटना समोर आली होती. या घटनेच्या धक्क्याने गायत्री पाटीलचे वडील भैया पाटील यांनी आत्महत्या केली होती. मात्र या प्रकरणात वेगवेगळे ट्विस्ट समोर आले असून या घटनेची वस्तुस्थिती ही वेगळी असल्याचे राज्य महिला आयोगाचे अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले आहे.
लग्नाचा बनाव करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या रॅकेटमध्ये गायत्री आणि तिच्या आईचाही सहभाग असल्याची माहिती रूपाली चाकणकर यांनी दिली. दरम्यान वडिलांच्या आत्महत्येपासून बेपत्ता असलेल्या गायत्रीला पोलिसांनी परभणी येथून ताब्यात घेतले असून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात गायत्री आणि तिच्या आईची रूपाली चाकणकर यांच्याकडून चौकशी करण्यात आली.
चार ठिकाणी लग्न करून अनेकांची फसवणूक
या संपूर्ण घटनेत पोलीस तपासात अनेक खळबळजनक खुलासे समोर आले. गायत्रीने लग्नाचा बनाव करून एका टोळीशी संगनमत करत पुणे परभणी कोल्हापूर आणि जळगाव येथे चार ठिकाणी विवाह करून अनेकांची फसवणूक केल्याची माहिती ही पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे. या प्रकरणात गायत्री पाटीलसह तिची आई मनीषा पाटील यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. पुढील तपास सुरू आहे.
