महाबळेश्वर-पाचगणी परिसरात सध्या आंतरराष्ट्रीय दर्जाची पॅराग्लायडिंग स्पर्धा सुरू आहे. जगभरातील अनुभवी पायलट्स या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. क्रिझस्टोफ मार्टिन हा त्यापैकीच एक स्पर्धक. पाचगणी येथून उड्डाण घेतल्यानंतर हवामानात अचानक बदल झाला. वाऱ्याचा वेग आणि दिशा बदलल्यामुळे मार्टिनचा पॅराग्लायडर नियंत्रणाबाहेर गेला आणि तो भरकटत भोर तालुक्याच्या दिशेने सरकला.
advertisement
काही वेळ हवेत भरकटल्यानंतर मार्टिनने परिस्थितीवर नियंत्रण ठेवत सुरक्षित लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. अखेर रावडी गावातील एका शेतातील मोकळ्या जागेत त्याने यशस्वीरीत्या लँडिंग केले. गावकऱ्यांनी आकाशातून खाली येणारे पॅराशूट पाहताच कुतूहलाने त्या दिशेने धाव घेतली. काही क्षणांतच त्या ठिकाणी ग्रामस्थ आणि तरुणांची मोठी गर्दी जमली.
सुरुवातीला नेमके काय घडले आहे, याची कुणालाही कल्पना नव्हती. मात्र, तरुणांनी धाडसाने पुढे जात मार्टिनशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तो पोलंड देशातून आलेला स्पर्धक असून पाचगणीहून भरकटून येथे आल्याचे त्याने सांगितले. स्थानिक तरुणांनी तोडक्या-मोडक्या इंग्रजीत त्याच्याशी संवाद साधला आणि त्याला धीर दिला. गावकऱ्यांनी त्याची चौकशी करून तो सुरक्षित असल्याची खात्री केली.
यानंतर तरुणांनी तत्परता दाखवत इंटरनेटच्या मदतीने स्पर्धा आयोजकांचा दूरध्वनी क्रमांक मिळवला. आयोजकांशी संपर्क साधून संपूर्ण घटनेची माहिती देण्यात आली. सुमारे तीन तासांनंतर स्पर्धास्थळाहून एक वाहन रावडी गावात दाखल झाले. त्या वाहनातून मार्टिनला पुन्हा पाचगणीकडे रवाना करण्यात आले.
या दरम्यान मार्टिनने गावातील तरुणांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. स्थानिकांनी त्याला बर्फी खाऊ घातली. ग्रामीण भागातील साधेपणा आणि आपुलकीचा अनुभव घेत तो भारावून गेला. विशेष म्हणजे, स्थानिक शिवभक्त तरुणांच्या सोबतीने त्याने छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणाही दिली. या घोषणेने उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
पाचगणीकडे रवाना होण्यापूर्वी मार्टिनने ग्रामस्थांनी केलेल्या मदतीबद्दल आणि दिलेल्या प्रेमळ वागणुकीबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानले. भारतातील लोक खूप मदतीचे आणि मनमिळावू आहेत, असे तो म्हणाला असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.
मार्टिन सुरक्षितरित्या रवाना झाल्यानंतरही या घटनेची चर्चा संपूर्ण परिसरात रंगली. आकाशातून अचानक उतरलेला परदेशी पाहुणा आणि त्याला दिलेली ग्रामस्थांची साथ यामुळे रावडी गावाचे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. संकटाच्या क्षणी दाखवलेली तत्परता आणि माणुसकी यामुळे रावडीकरांचे सर्वत्र कौतुक होत आहे.





