सोलापूर : शहरात भिशीच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या पती-पत्नीला अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. श्री ओम साई फायनान्स या संस्थेच्या नावाखाली या दाम्पत्याने अनेक ठेवीदारांकडून कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला होता. रमेश अंबादास चिप्पा आणि पत्नी सुजाता रमेश चिप्पा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून दोघेही गेल्या वर्षभरापासून फरार होते.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, 2020 ते 2024 दरम्यान या पती-पत्नीने ‘श्री ओम साई फायनान्स’ या नावाने भिशी चालवली. त्यामध्ये नागरिकांना आकर्षक व्याजदर आणि जास्त परतावा देण्याचं आमिष दाखवण्यात आलं. जवळपास 131 ठेवीदारांकडून तब्बल 2 कोटी 69 लाख 19 हजार रुपये जमा करून घेतले. सुरुवातीला काहींना परतावा देत विश्वास संपादन करण्यात आला. मात्र नंतर हळूहळू पैसे देणं थांबवलं आणि कार्यालय बंद करून दोघेही फरार झाले.
131 ठेवीदारांना फसवलं
फसवणुकीचा प्रकार उघड झाल्यानंतर शिवाजी लक्ष्मण पवार यांच्यासह 131 ठेवीदारांनी जेल रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की आरोपी दाम्पत्य आंध्रप्रदेशात लपून बसले आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाळत ठेवून दोघांना अटक करण्यात यश मिळवले.
दोघांनाही 17 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
अटक केल्यानंतर आरोपींना सोलापुरात आणून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांनाही 17 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून या प्रकरणात आणखी ठेवीदारांची चौकशी सुरू आहे. या प्रकारामुळे शहरातील नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, भिशी आणि फायनान्स योजनांवर गुंतवणुकीपूर्वी विचार करण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना दिला आहे.
सतर्क राहण्याचे आवाहन
या फसवणूक प्रकरणाने पुन्हा एकदा भिशी आणि खासगी फायनान्स संस्था या नावाखाली सुरू असलेल्या आर्थिक फसवणुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी अधिकृत बँकांव्यतिरिक्त अशा संस्थांमध्ये गुंतवणूक करताना सतर्क राहणं आवश्यक असल्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.
