नुकतीच मुंबईत एक धक्कादायक घटना घडली. एका महिलेच्या फोनचा नेटवर्क अचानक बंद झाला आणि अवघ्या काही मिनिटांतच तिच्या बँक खात्यातून लाखो रुपये लंपास झाले. हा साधा तांत्रिक बिघाड नव्हता, तर हा होता. 'e-SIM फ्रॉड'. गृह मंत्रालयाच्या सायबर सुरक्षा विभागाने (I4C) या घटनेचा दाखला देत संपूर्ण देशाला सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
advertisement
नक्की काय आहे हा 'e-SIM' फ्रॉड?
आजकाल अनेक महागड्या फोन्समध्ये फिजिकल सिम कार्डऐवजी 'ई-सिम' वापरलं जातं. सायबर गुन्हेगार याच तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेत आहेत. हा प्रकार 'सिम स्वॅप' (SIM Swap) सारखाच आहे.
गुन्हेगारांची पद्धत:
1. खोटा कॉल: ठग तुम्हाला टेलिकॉम कंपनीचा कर्मचारी असल्याचे भासवून कॉल करतात.
2. सिम अपग्रेडचं गाजर: "तुमचं सिम कार्ड जुनं झालंय, नेटवर्क वाढवण्यासाठी ते ई-सिममध्ये बदलून घ्या," असं ते तुम्हाला सांगतात.
3. माहिती चोरी: बोलण्या-बोलण्यात ते तुमची वैयक्तिक माहिती आणि फोनवर आलेला एक 'कोड' विचारून घेतात.
4. ताबा मिळवणे: तुमच्या माहितीच्या आधारे ते तुमच्या नंबरवर नवीन ई-सिम सक्रिय करतात. जसं त्यांच्याकडे नवीन ई-सिम सुरू होतं, तसं तुमच्या फोनमधील नेटवर्क कायमचं बंद होतं.
ओटीपी (OTP) आता त्यांच्या ताब्यात
एकदा तुमचा नंबर त्यांच्या ताब्यात गेला की, तुमच्या बँक खात्याचे सर्व व्यवहार ते करू शकतात. कारण बँकेचे सर्व ओटीपी आता तुमच्या ऐवजी त्यांच्या फोनवर जाऊ लागतात. जोपर्यंत तुम्हाला समजतं की काहीतरी चुकीचं घडतंय, तोपर्यंत तुमचं बँक खातं रिकामं झालेलं असतं.
स्वतःचा बचाव कसा करायचा?
अनोळखी कॉल्सवर विश्वास ठेवू नका: कोणतीही टेलिकॉम कंपनी तुम्हाला फोन करून सिम अपग्रेड किंवा ई-सिमसाठी वैयक्तिक माहिती विचारत नाही.
सिम कार्ड किंवा नेटवर्कशी संबंधित काहीही अडचण असल्यास स्वतः कंपनीच्या अधिकृत गॅलरीमध्ये किंवा स्टोअरमध्ये जा.
सरकारी नियमांनुसार, कंपनीचे अधिकृत कॉल्स एका ठराविक नंबर सिरीजमधून येतात. जर कोणी सामान्य मोबाईल नंबरवरून कॉल करून तुमची माहिती मागत असेल, तर तो फ्रॉड असू शकतो.
फसवणूक झाल्यास काय करावे?
1. जर फोनचा नेटवर्क विनाकारण अचानक गेला असेल, तर तातडीने दुसऱ्या फोनवरून तुमच्या बँक खात्याचे व्यवहार तपासा आणि बँक कार्ड्स ब्लॉक करा.
2. तात्काळ 1930 या सायबर क्राईम हेल्पलाईन नंबरवर कॉल करा.
3. 'संचार साथी' (Sanchar Saathi) पोर्टलवर जाऊन तुमची तक्रार नोंदवा.
थोडक्यात सांगायचे तर तंत्रज्ञान जितकं प्रगत होतंय, तितकेच चोरटेही हुशार होत आहेत. फोनचा नेटवर्क गायब होणं ही साधी गोष्ट वाटत असली तरी, आजच्या काळात ती तुमच्या आर्थिक सुरक्षेसाठी धोक्याची घंटा असू शकते.
