लातूर: लातूर जिल्ह्यातील जळकोट ते नांदेड जिल्ह्यातील कंधार या महामार्गावर दिग्रस ते पाटोदा दरम्यान अंगावर काटा आणणारी एक घटना घडली आहे. ज्यात एका कार चालकाने ७० वर्षीय वृद्ध महिलेला तब्बल 15 किलोमीटर लांब फरफटत घेऊन गेल्याने त्या महिलेचा मृत्यू झाला आहे.
मूळच्या कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्याच्या हुमनाबाद तालुक्यातील चिमाबाई विठ्ठलराव बाचीपळे या ७० वर्षीय आजीबाई एका लग्नासाठी नांदेड जिल्ह्यात आल्या होत्या. तिथून परतत असताना दिग्रस या ठिकाणी मळमळ होत असल्याने उलटी करण्यासाठी या आजीबाई थांबल्या होत्या. मात्र नांदेडकडून जळकोट मार्गावर भरधाव वेगात जाणाऱ्या एका इंडिका कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या या आजीबाईंना धडक दिली. तसेत वृद्ध महिलेचं शरीर भरधाव कार सोबत फरफटत नेले. यावेळी या इंडिका कारचा पाठलाग ही करण्यात आला.
advertisement
वृद्ध महिलेला फरपटत नेल्याने दुर्दैवी मृत्यू
लातूर जिल्ह्यातील जळकोटहून उदगीर जाणाऱ्या रस्त्यावर रक्ताचे डाग दिसत होते. मात्र रात्रीची वेळ असल्याने आजीबाई सापडल्या नाहीत. अखेर आजीबाईचा मुलगा तानाजीने जळकोट पोलीस ठाण्याशी संपर्क केला. त्यानंतर सकाळी जळकोट तालुक्यातील पाटोदा (बु.) पाटीजवळ निर्वस्त्र अवस्थेत चिमाबाईचे मृत शरीर रस्त्यावर पडलेले दिसून आले. अतिशय बेदरकरपणे 70 वर्षीय वृद्ध महिलेला फरपटत नेल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
महिलेच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला
दरम्यान याप्रकरणी जळकोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आहे. आता त्या अज्ञात इंडिका कारच ड्रायव्हरचा शोध घेत असून या मार्गावरील सीसीटीव्ही तपासण्याचे ही काम सुरू आहे. गाडी चालवत असताना चालक शुद्धीत होता की मद्यधुंद अवस्थेत होता हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कारचालक सापडल्यानंतर याबाबतची माहिती मिळेल. पण, या घटनेने महिलेच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.