हरियाणातील एका घटनेने संपूर्ण देशाला मोठा धक्का दिला आहे. पानिपत येथे एका निष्पाप चिमुकल्या मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला आणि पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा तपास सुरू केला, तेव्हा कुटुंबालाही कल्पना नव्हती की या एका मृत्यूमागे चार निष्पाप जीवांची क्रूर हत्या दडलेली आहे.
पोलिसांच्या चौकशीत जे भयानक सत्य समोर आले, त्याने प्रत्येकाच्या अंगावर काटा आणला आहे. सोनिपतच्या भावड गावची रहिवासी असलेल्या पूनम नावाच्या एका महिलेला चार मुलांची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
advertisement
पोलिसांच्या चौकशीत पूनमने जे कबूल केले, ते ऐकून तपास करणाऱ्या पोलिसांनाही मोठा धक्का बसला. पूनमने केवळ आपल्या चुलत बहिणीच्या मुलीला पाण्यात बुडवून मारले नाही, तर तिने आपल्या तीन वर्षांच्या मुलाला देखील त्याच पद्धतीने संपवले. याशिवाय, तिने आपल्या नंदेच्या मुलीची (इशिका) आणि भावाच्या मुलीची (जिया) सुद्धा हत्या केली होती.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या चारही बालकांचा मृत्यू त्यांच्या कुटुंबियांनी अपघात (Accident) मानून स्वीकारला होता. कोणालाही साधा संशयही आला नाही की या सर्व घटनांमागे एकच महिला असू शकते.
आरोपी पूनमचा नवरा नवीन यांनी पोलीस चौकशीनंतर जे सत्य उघड केले, त्याने या प्रकरणाला अधिकच भयाण स्वरूप दिले. नवीन यांनी अतिशय वेदनेने सांगितले की, "ज्या प्रकारे मुलांना पाण्यात तडपवून मारले गेले, तशीच कठोर शिक्षा पूनमलाही मिळाली पाहिजे. जेव्हा मी त्या मुलांच्या वेदनेची कल्पना करतो, तेव्हा माझाच थरकाप उडतो."
नवीन यांच्या म्हणण्यानुसार, पूनम नेहमी मुलांची प्रेमाने काळजी घ्यायची. ती मानसिकरित्या अस्वस्थ आहे किंवा तिला कोणताही आजार आहे, याचे तिने कधीही संकेत दिले नाहीत. लोकांना वाटत असलेल्या 'जादूटोणा' करण्याच्या अफवाही त्यांनी साफ फेटाळून लावल्या. शुभमच्या मृत्यूवेळीही त्यांनी तो अपघात मानला आणि गप्प राहिले. पूनमने प्रत्येक हत्या अत्यंत शांतपणे आणि एकाच पद्धतीने केली, ज्यामुळे कोणालाही संशय आला नाही. ती सामान्यपणे मुलांसोबत खेळायची आणि संधी मिळताच त्यांना पाण्यात बुडवून मारायची. आश्चर्य म्हणजे पुनमने प्रत्येक मुलाला एकादशीच्या दिवशी मारले आणि ते ही पाण्यात बुडवून. तिचा हा पॅटर्न लक्षा येताच. आता ही सायको किलर वाटणारी कहाणी अघोरी कृत्याकडे वळण घेत आहे. पण सत्य हे तपासाताच समोर येईल.
नवीन आणि पूनमचे लग्न 2019 मध्ये झाले होते आणि सुरुवातीला पूनम अगदी सामान्य होती. ती फक्त वेळोवेळी नाराज होऊन माहेरी जायची, जो एक सामान्य वैवाहिक जीवनाचा भाग वाटत होता.
पूनमच्या कबुलीमुळे पानिपत आणि सोनिपत परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, एकाच कुटुंबातील चार लहान मुलांचा बुडून मृत्यू झाला, तरी कोणालाही इतके दिवस संशय का आला नाही? पोलीस सध्या सर्व घटनास्थळे आणि परिस्थितीची पुन्हा तपासणी करत आहेत.
नवीन यांना आता वाटते की, त्यांनी आपल्या मुलाला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण धोका घरातच लपलेला होता हे त्यांना माहीत नव्हते. या संपूर्ण घटनेने समाजासमोर एक गंभीर प्रश्न उभा केला आहे की, एखाद्या व्यक्तीच्या मनात काय चालले आहे, हे बाहेरुन पाहून समजणे किती कठीण आहे.
