अनेकदा सोशल मीडियावर अर्चनाजींना "फक्त हसण्याचे पैसे मिळतात" अशा कमेंट्सद्वारे ट्रोल केले जाते. पण, या शोमध्ये नक्की सगळ्यात जास्त कमाई कोण करतं? स्वतः अर्चना पूरन सिंह यांनीच आता या गुपितावरून पडदा उठवला आहे.
अर्चना पूरन सिंह यांचा मुलगा आर्यमन याने नुकताच एक व्लॉग शेअर केला आहे. या व्लॉगमध्ये अर्चना यांच्यासोबत त्यांचे पती परमीत सेठी आणि लहान मुलगा आयुष्मान देखील दिसत आहेत. हा सर्व परिवार सध्याचा लोकप्रिय स्टँड-अप कॉमेडियन समय रैना त्यांच्या घरी पोहोचला होता. तिथे समयची लक्झरी कार पाहून अर्चना कौतुकाने म्हणाल्या की, "आता आम्हालाही अशी कार घ्यावी लागेल."
advertisement
या गप्पांच्या ओघात जेव्हा कमाईचा विषय निघाला, तेव्हा अर्चना यांनी स्पष्टपणे सांगितले की, "कपिल शर्मा शोमध्ये फक्त कपिलच मोठी कमाई करतो, मी नाही!"
समय रैना आणि अर्चना यांची जुगलबंदी
व्लॉगमध्ये समय रैना अर्चना यांच्या लेव्हलला पोहोचण्याची इच्छा व्यक्त करताना दिसला. तो म्हणाला की, "मलाही त्या उंचीवर पोहोचायचं आहे जिथे फक्त हसून पैसे कमवता येतात." यावर अर्चना यांनी मिश्किलपणे उत्तर दिले की, त्या शोमध्ये मुख्य कमाई कपिलचीच असते. गेल्या अनेक वर्षांपासून अर्चना आणि कपिलची जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करत असली, तरी मानधनाच्या बाबतीत कपिल अव्वल असल्याचं अर्चना यांनी मान्य केलं आहे.
सध्या नेटफ्लिक्सवर 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा चौथा सीझन गाजत आहे. विशेष म्हणजे, या सीझनमध्ये अर्चना पूरन सिंह यांच्यासोबत पुन्हा एकदा नवजोत सिंह सिद्धू यांची झलक पाहायला मिळत आहे. या शोमध्ये सुनील ग्रोवर, कृष्णा अभिषेक आणि कीकू शारदा यांची जबरदस्त कॉमेडी प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. राणी मुखर्जी, प्रियांका चोप्रा आणि कार्तिक आर्यन सारखे मोठे स्टार्स या सीझनची शोभा वाढवत आहेत.
नेटफ्लिक्सवर चौथ्या सीझनला मिळणारा प्रतिसाद पाहून निर्मात्यांनी पाचव्या सीझनची घोषणा आधीच केली आहे. कपिल शर्मा आणि त्याच्या टीमची लोकप्रियता केवळ भारतातच नाही, तर जागतिक स्तरावर वाढत आहे, हेच यावरून सिद्ध होतंय. ट्रोलर्स काहीही म्हणोत, पण अर्चना पूरन सिंह यांच्या हसण्याशिवाय कपिलचा शो अपूर्ण आहे, हे मात्र नक्की.
