'लग्नाचं गुपित सध्या गुपितच राहणार!' - राजेश्वरीचा खुमासदार खुलासा
राजश्री मराठीला दिलेल्या एका खास मुलाखतीत राजेश्वरी खरातने तिच्या लग्नाच्या चर्चांवर पहिल्यांदाच उत्तर दिलं आहे. तिने हसून म्हटलं, "आमचं लग्न झालंय की नाही? हा प्रश्न मी सध्या गुपित ठेवते. कारण लग्न झालंय की नाही झालंय? हे पब्लिकला ठरवू द्या... मी सर्वांना काही दिवसांत गुड न्यूज देणार आहे. मला थोडासा सस्पेन्स ठेवायचा आहे."
advertisement
राजेश्वरीच्या या उत्तराने चाहत्यांची उत्सुकता अजूनच वाढली आहे. तिच्या बोलण्यातून हे स्पष्ट होतंय की, काहीतरी मोठं गुपित दडलं आहे, जे लवकरच उघड होणार आहे. तिने पुढे सांगितलं, "शूटचा जो विषय आहे, त्याबाबत मला सांगायला आवडेल की, लवकरच सर्वांना चांगले प्रोजेक्ट्स, स्टोरीज आणि स्क्रिप्ट्स पाहायला मिळतील. सोमनाथ आणि माझी जी अधुरी कहाणी होती, ती आता पूर्ण झालेली किंवा काही प्रमाणात अधुरी... मग प्रेम, ड्रामा सगळं पाहायला मिळणार आहे." त्यामुळे, खऱ्या आयुष्यात लग्न झाले आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. ही केवळ चित्रपटाची किंवा वेब सिरीजची कथा आहे की खऱ्या आयुष्यातील घटना, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
धर्मावरून टीका आणि ट्रोलर्सना राजेश्वरीचे सडेतोड उत्तर
लग्नाच्या चर्चांबरोबरच राजेश्वरीला एका वेगळ्याच मुद्द्यावरून ट्रोल केले जात आहे, तो म्हणजे तिचा धर्म. यावरही तिने अत्यंत स्पष्ट आणि परखडपणे आपली भूमिका मांडली आहे. ती म्हणाली, "माझा जन्म ख्रिश्चन घरातच झालेला आहे. मी लहानपणापासूनच ख्रिश्चन आहे. मी कोणताही धर्म बदललेला नाही."
तिने या ट्रोलिंगबद्दल खंत व्यक्त करत म्हटलं, "एक खंत नक्की आहे की, लोकांचा दृष्टिकोन मर्यादित आहे. इतका मर्यादित आहे की, लोकांना पुढचं सत्य पाहायचं नाही. काही विचार करायचा नाही आणि धडाधड कमेंट्स टाकायचा, असं सुरू आहे. ट्रोलर लोकांना स्पॉटलाईटमध्ये राहायला आवडतं. कमेंट्समध्ये चुकीचं लिहितात आणि 'आय लव्ह यू', 'मला तुला भेटायचं आहे', असे डायरेक्ट मेसेज करतात."
राजेश्वरीने ट्रोल करणाऱ्यांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करत म्हटलं, "प्रत्येकाला प्रत्येकाचं मत असतं. धर्म बदलणे ही एक पर्सनल चॉइस आहे. प्रत्येकाला तो अधिकार आहे. लोकांनी टीका करणे चुकीचे आहे. जे लोक टीका करतात, त्यांच्या आयुष्यात टेन्शन आहे. अयशस्वी आहेत, त्यांना सोशल मीडियावर कमेंट्स करण्याची जागा मिळते. तुम्ही योग्य त्या भाषेत बोलू शकता." तिच्या या बोलण्यातून, समाजातील एका वाईट प्रवृत्तीवर तिने नेमका प्रकाश टाकला आहे. राजेश्वरीने आपल्या खासगी आयुष्याबद्दलचा सस्पेन्स कायम ठेवला असला तरी, तिच्या स्पष्टवक्तेपणाने तिने अनेकांची मनं जिंकली आहेत. आता तिची 'गुड न्यूज' कधी येणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
