'झुकेगा नही' म्हणणारा दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन २०२५ हे वर्ष संपता संपता एका मोठ्या कायदेशीर पेचात अडकला आहे. गेल्या वर्षी हैदराबादमध्ये 'पुष्पा २' च्या प्रीमियरवेळी झालेल्या भीषण चेंगराचेंगरी प्रकरणात पोलिसांनी आता अभिनेत्यासह २३ जणांविरोधात अधिकृत आरोपपत्र दाखल केलं आहे.
अल्लू अर्जुन कायद्याच्या कचाट्यात
हैदराबादच्या चिक्कडपल्ली पोलिसांनी २४ डिसेंबर रोजी हे १०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून पोलिसांनी एकूण २३ जणांना दोषी धरलं आहे. विशेष म्हणजे, या यादीत सुपरस्टार अल्लू अर्जुनचं नाव आरोपी क्रमांक ११ म्हणून नमूद करण्यात आलं आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी हे संध्या थिएटरचे व्यवस्थापन आहे. मात्र, केवळ व्यवस्थापनच नाही, तर अल्लू अर्जुनचे ३ मॅनेजर, ८ बाउन्सर आणि खाजगी सुरक्षा रक्षकांवरही या दुर्घटनेसाठी जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
advertisement
Bangladesh: 'या' भारतीय स्टार्ससाठी वेडी आहे बांग्लादेशी जनता, एक तर बनला सुपरस्टार! कोण आहेत ते?
त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं?
४ डिसेंबर २०२४ रोजी हैदराबादमधील आरटीसी एक्स रोडवरील संध्या थिएटरमध्ये 'पुष्पा २' चा भव्य प्रीमियर आयोजित करण्यात आला होता. आपल्या लाडक्या 'पुष्पा'ला पाहण्यासाठी चाहत्यांनी तिथे तुफान गर्दी केली होती. मात्र, नियोजनाचा अभाव आणि वाढत्या गर्दीमुळे तिथे अचानक चेंगराचेंगरी झाली. या गोंधळात रेवती नावाच्या एका ३५ वर्षीय महिलेचा गुदमरून मृत्यू झाला, तर तिचा ८ वर्षांचा मुलगा श्रीतेज गंभीर जखमी झाला. एका सुखी कुटुंबाचा आनंद या दुर्घटनेने कायमचा हिरावून नेला.
या घटनेनंतर १३ डिसेंबर रोजी अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती, मात्र दुसऱ्याच दिवशी त्याला जामीन मिळाला. पोलिसांनी ३१ डिसेंबर रोजी त्याची ३ तास कसून चौकशी केली होती. त्यावेळी अल्लूने आपली बाजू मांडताना सांगितलं होतं की, "घटनेच्या वेळी मी तिथे उपस्थित नव्हतो आणि मला या मृत्यूची माहिती दुसऱ्या दिवशी मिळाली."
पीडित कुटुंबाला अल्लू अर्जुनच्या वडिलांकडून आर्थिक मदत
मानवतेच्या दृष्टिकोनातून 'पुष्पा २' च्या टीमने पीडित कुटुंबाला २ कोटी रुपये आणि अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंद यांनी १ कोटी रुपये, अशी एकूण ३ कोटींची मदत दिली होती. मात्र, आर्थिक मदत दिली असली तरी कायद्याच्या कचाट्यातून अभिनेता अद्याप सुटलेला नाही.
पोलिसांनी दाखल केलेल्या या आरोपपत्रामुळे आता अल्लू अर्जुनला वारंवार कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागण्याची शक्यता आहे. चित्रपटाचं यश एका बाजूला आणि हा कायदेशीर लढा दुसऱ्या बाजूला, अशा कात्रीत सध्या सुपरस्टार अडकला आहे.
