व्हिडिओमध्ये एलिझाबेथ हॉस्पिटलच्या बेडवर असून तिला ऑक्सिजन ट्यूब लावलेली दिसत आहे. या अवस्थेत तिने एक धक्कादायक विधान केलं आहे. ती म्हणाली, "जर मला काही झालं, तर त्याला बाला आणि त्याचं कुटुंबच जबाबदार असेल!" तिच्या या विधानाने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवूनही कारवाई नाही? एलिझाबेथचा गंभीर आरोप!
एलिझाबेथने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की, तिने मुख्यमंत्री पिनराई विजयन यांना पत्र लिहून तक्रार केली होती. तरीही तिच्या प्रकरणात कोणतीही कारवाई झाली नाही. हिंदुस्थान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, एलिझाबेथ व्हिडिओमध्ये म्हणाली, "लोक म्हणतात की, महिलांनी तक्रार केल्यावर त्यांना न्याय मिळतो. पण माझ्या बाबतीत असं काहीच झालं नाही. मी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवूनही पोलिसांनी बालावर कोणतीही कारवाई केली नाही."
advertisement
'तुझी लायकी नसताना...', रितेश देशमुखबद्दल बरळणाऱ्या सोशल मीडिया स्टारला डिपी भाऊने झाप झाप झापलं
एलिझाबेथने पुढे बालावर अनेक आरोप केले. ती म्हणाली, "बालाने धमकीचे व्हिडिओ बनवले, माझ्यावर खोटे आरोप केले. मी पैशांसाठी खोटं बोलत असल्याचं त्याने सांगितलं. इतकंच नाही तर त्याने आमच्या लग्नालाच नकार दिला, जे बालाने स्वतःच आधी मान्य केलं होतं."
बालाने मला शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या त्रास दिला - एलिझाबेथ
एलिझाबेथने आपल्या वेदना व्यक्त करत म्हटलं, "जर मी मरण पावले, तर ती व्यक्ती पूर्णपणे जबाबदार असेल. मी वकिलांवर पैसे खर्च केले, खटला लढले. आता तर मला असं वाटतंय की, खटला दाखल करून मी चूक केली का?" व्हिडिओमध्ये एलिझाबेथ पुढे म्हणते, "त्याने मला शारीरिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या त्रास दिला आहे. मीडियामध्ये माझी बदनामी केली. फक्त तोच नाही, तर त्याचं संपूर्ण कुटुंब यात सामील आहे."
एलिझाबेथने असंही सांगितलं की, "कोर्टाने आम्हाला एकमेकांच्या आयुष्यात ढवळाढवळ न करण्याचे आदेश दिले होते, तरीही तो मला सतत धमक्या देत आहे." मात्र, एलिझाबेथने तिला रुग्णालयात का दाखल करण्यात आलं आहे, याचं कारण सांगितलेलं नाही.
बालाची चार लग्नं आणि एलिझाबेथसोबतच्या नात्याचा गुंता!
बाला आणि एलिझाबेथचं लग्न २०२१ मध्ये झालं होतं. पण २०२४ मध्ये त्यांचं लग्न कायदेशीर नसल्याचा दावा करत ते दोघे वेगळे झाले. यानंतर दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते. बालाने एलिझाबेथला 'मानसिकदृष्ट्या अस्थिर' म्हटलं होतं, तर एलिझाबेथने त्याच्यावर फसवणूक आणि छळाचा आरोप केला होता.
अभिनेता बालाने एकूण चार लग्न केली आहेत. २००८ मध्ये त्याने चंदना सदाशिवसोबत लग्न केलं, पण २००९ मध्ये ते मोडलं. त्यानंतर २०१० मध्ये त्याने अमृता सुरेशशी लग्न केलं, पण २०१९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. बालाने २०२१ मध्ये एलिझाबेथ उदयन्शी लग्न केलं आणि २०२४ मध्ये ते वेगळे झाले. त्यानंतर त्याने कोकिलासोबत चौथं लग्न केलं. बाला आणि एलिझाबेथ यांच्यातील हा वाद आता कोणत्या वळणावर जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
