गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात पुष्पा नावाचं वादळ आलं होतं. या सिनेमाने आजवरचे सगळे रेकॉर्ड्स मोडले. चित्रपटाने जगभरात १२०० कोटींहून अधिकचा गल्ला जमवला. अशातच हा चित्रपट आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. दरम्यान या चित्रपटात काम केलेल्या कोरिओग्राफरने बॉलिवूड आणि साउथ सिनेसृष्टीत मिळणाऱ्या वागणुकीतील फरक दाखवून दिला आहे.
बॉलीवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी पुष्पा या चित्रपटातील लोकप्रिय ‘ऊ अंतावा’ गाण्याची कोरिओग्राफी केली. पुष्पा २ मध्येही त्यांनी कोरिओग्राफर म्हणून काम पाहिले. नुकतंच गणेश यांनी एका पॉडकास्टमध्ये ‘पुष्पा’च्या अनुभवाबद्दल सांगितलं आणि त्यांच्या या खुलाशाने सिनेविश्वात नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
advertisement
गणेश आचार्य म्हणाले, “मी 'पुष्पा'साठी गाणी कोरिओग्राफ करून मुंबईत परतलो, आणि पाच दिवसांनी मला थेट अल्लू अर्जुनचा फोन आला. त्यांनी माझ्या कामाचं तोंडभरून कौतुक केलं.” गणेश पुढे म्हणाले, “हा माझ्या कारकिर्दीतील असा एक क्षण होता, जेव्हा एखाद्या स्टारने स्वतःहून फोन करून कोरिओग्राफरचं कौतुक केलं. दुर्दैवाने, बॉलिवूडमधील कोणत्याही स्टारने आजवर असं केलं नव्हतं.”
त्यांनी याच वेळी ‘पुष्पा’च्या सक्सेस पार्टीचाही एक विशेष किस्सा शेअर केला. “माझं हेदराबादमध्ये पार्टीसाठी बोलावणं झालं, तर सुरुवातीला वाटलं की फक्त जेवण-खाणं होईल. पण तिथे पोहोचल्यावर आश्चर्याचा धक्का बसला. संपूर्ण टीम – कॅमेरामन, लाइटमॅन, टेक्निशियन – यांना थेट स्टेजवर सन्मानित केलं जात होतं. हे बघून मला खूप आनंद झाला.”
गणेश आचार्यने स्पष्ट केलं की, “मी बॉलिवूडवर टीका करत नाही, पण इथे एक घाण आहे, जी साउथमध्ये नाही. तिथे कामाविषयी आदर आहे, प्रत्येकाच्या योगदानाची दखल घेतली जाते.”
साउथ इंडस्ट्री आणि बॉलिवूडमधील काम करण्याच्या शैलीतील फरक स्पष्ट करताना गणेश आचार्य यांनी आपल्या अनुभवातून बोलत, सिनेसृष्टीतील एका सकारात्मक परिवर्तनाची आवश्यकता अधोरेखित केली. त्यांच्या या खुलाशाने आता या दोन इंडस्ट्रीमधील फरकाबाबत चर्चा सुरू झाली आहे.