मिळालेल्याा माहितीनुसार, कल्याण पूर्व भागामध्ये ही घटना घडली आहे. आयश विश्वनाथ अमीन (वय ३०) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. आयश अमीन हा कल्याण पूर्व परिसरात तिसगाव नाका परिसरात राहत होता. काही दिवसांपूर्वी नाका परिसरात आयश कामा निमित्ताने गेलाा होता. त्यावेळी एका भटक्या कुत्र्याने आयशला जोराचा चावा घेतला. आयशच्या पायाचा लचका तोडला होता. भटका कुत्रा चावल्यामुळे आयशने तातडीने रुग्णालयात जाणे गरजेचं होतं. पण, नंतर त्रास होऊ लागल्यामुळे तो डॉक्टरांकडे गेला आणि एकच इंजेक्शन घेतलं. त्यानंतर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे पुढील उपचार घेण्याचं टाळलं.
advertisement
रेबीजची जाणवू लागली लक्षणं
मागील ४ ते ५ दिवसांपासून आयशला त्रास जाणवू लागला. त्याच्यामध्ये रेबिजची लक्षण दिसून येऊ लाागली. आयशच्या वागण्यात बदल झाला. तो विचित्र वागू लागला. त्याला पाणी पाहून भीती वाटायला लागली. एवढंच नाहीतर आयशच्या हालचाली श्वानासारख्या होत चालल्याचं आढळून आलं. आयशमध्ये रेबीजची लक्षण आढळून यायला लागली होती. रेबीजचा संसर्ग मेंदूपर्यंत पोहोचल्यानं त्याचं मानसिक संतुलन बिघडलं असावं, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला.
राहत्या घरात घेतला गळफास
दिवसेंदिवस त्रास वाढतच चालला होता. त्यामुळे आयश हा पूर्ण थकला होता. रेबीजची लक्षण जाणवू लागल्यामुळे तो भ्रमिष्ठ झाला. होणाऱ्या त्रासाला वैतागून आयश याने राहत्या घरी गळफास गेऊन जीवन संपवलं. आयशने इतक्या टोकाचं पाऊल उचलल्यामुळे कुटुंबीय हादरून गेलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आयशचा मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून रेबीजसारख्या गंभीर आजाराबाबत पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरलं आहे.
