वसईतील कामन, चिंचोटी परिसरात अनेक हौशी पर्यटक फिरायला येतात. या भागातील पर्यटन पूर्णपणे असुरक्षित असून दरवर्षी याठिकाणी पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडतात. त्यादृष्टीने मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने मनाई आदेश लागू केले असून इथे जाणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
पावसाळ्यात मुंबईवर पाणीसंकट! तुमच्या घरात किती वेळ येणार पाणी? महानगरपालिकेनं थेट सांगितलं
advertisement
वसई तालुक्यातील तुंगारेश्वर, चिंचोटी हे धबधबे पर्यटकप्रिय आहेत. तुंगारेश्वर अभयारण्यातील डोंगराळ भागातील या धबधब्यावर जाण्यास आता बंदी घालण्यात आली आहे. याठिकाणी पर्यटकांनी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच मनाई आदेशाचे फलक देखील परिसरात लावण्यात आले आहेत. या मनाईमुळे पर्यटकांना येथून परत जावे लागत असून पालघर, डहाणू येथील पर्यटनस्थळांकडे पर्यटकांचा कल वाढण्याची शक्यता आहे.
जीवघेणा ठरतोय सेल्फी
या पर्यटनस्थळांवर सेल्फी घेण्यासाठी धोकादायक पद्धतीने स्टंट करताना अनेकांचा मृत्यू झालेला आहे. मनाई आदेश असतानाही काही पर्यटक जिवावर बेतणारे स्टंट करताना दिसत आहेत. त्यामुळे अशा पर्यटकांवर पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे.