सध्या शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढत असून शेती अवजारांमध्येही मोठे बदल होत आहेत. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांना शेतीची कामे करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याच समस्येचा विचार करून करमाळा तालुक्यातील रणजीत निंबाळकर यांनी हरिहर ऍग्रो रिसर्च इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना करून मानव, ट्रॅक्टर आणि पावर टिलर चलित पेरणी यंत्र विकसित केले आहे.
advertisement
या यंत्राच्या वापरामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च दोन्हींची बचत होणार आहे. तसेच पेरणी करताना दोन ओळींमधील अंतर चार इंचांपासून ते आवश्यकतेनुसार वाढवता किंवा कमी करता येते, ही या यंत्राची विशेष बाब आहे.
भारतामधील बहुतांश पेरणी यंत्रांमध्ये काही प्रमाणात बियाणे शिल्लक ठेवावे लागते. मात्र या नव्या यंत्रामध्ये बियाणे शिल्लक राहत नाही आणि संपूर्ण बियाण्याची अचूक पेरणी होते. या पेरणी यंत्राद्वारे कांदा, मेथी, कोथिंबीर, मका, सोयाबीन, कापूस, गाजर, तूर, भुईमूग यांसारख्या विविध पिकांची पेरणी करता येते. या यंत्राला बनवण्यासाठी 15 हजार खर्च आला आहे. तर याची किंमत 25 हजार रुपये आहे.
परिणामी, महागडी बियाणे कमी प्रमाणात लागतात आणि शेतकऱ्यांचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होतो. वेळेची बचत होत असल्याने शेतीतील कामे अधिक वेगाने आणि अचूकपणे पूर्ण करणे शक्य होत आहे. त्यामुळे हे पेरणी यंत्र शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. तसेच या यंत्राला शासकीय अनुदान देखील उपलब्ध असल्याची माहिती रणजीत निंबाळकर यांनी दिली.





